पुणे – पुण्यातील औंध गाव परिसरात देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूर्ती स्थापन करून मंदिराची उभारणी करण्यात आली होती. येथे मोदींचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. आता या मंदिरातून मोदींचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे. ही मूर्ती का हटवण्यात आली याबाबत भाजप नेते अॅड मधुकर मुसळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
मुसळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, ‘मदीर उभारणारे मयुर मुंडे यांची मंदीर उभारण्यापाठीमागे फार चांगली भावना होती. परंतू काल मला भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याचा फोन आला व जिवंत व्यक्तीची अशा प्रकारे मंदिर बांधून पूजा करणे हे भारतीय जनता पार्टीच्या तत्वाला व विचारधारेला अनुसरून नसल्याने त्यांनी समजावून सांगितले की, आपल्या मनामध्ये पंतप्रधान यांच्याबद्दल असलेल्या भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहीररीत्या व्यक्त न करता त्या भावना मनातच ठेवाव्यात व त्यानुसार कृती व कार्य करावे. त्यांचे म्हणणे योग्य असून मयूर मुंडे यांना याविषयी मी कल्पना दिली. त्याप्रमाने भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरातील मूर्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे.’
मूर्ती कार्यालयात –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची भावना, आदर असाच कायम राहणार असून ती मूर्ती आम्हाला सदैव प्रेरणा देण्यासाठी म्हणून आमच्या कार्यालयामध्ये ठेवणार आहोत. तिथे मूर्ती पूजा न करता सर्वांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून आमच्या वैयक्तिक कार्यालयामध्ये ही मूर्ती ठेवण्यात येणार असल्याचेही मुसळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मंदिरासाठी एवढा केला होता खर्च –
भाजप कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी परिहार चौकात मोदी मंदिराची उभारणी केली होती. या मंदिरासाठी त्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांचा खर्च केला होता. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या मार्फत जयपूर येथून मोदी यांचा अर्धपुतळा तयार करून आणण्यात आला होता.