रत्नागिरी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरी येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रसवर जोरदार टीका केली. विशेषत: त्यांनी आज अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे –
– कोकणवासियांनो आता तरी जागे व्हा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की, आपले शत्रू समुद्रमार्गाने येतील. त्यामुळे समुद्रावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवा. पण आपण दुर्लक्ष केलं.
– २६/११ चा अतिरेकी हल्ला करणारे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. १९९२ च्या बॉम्बस्फोटात वापरलेलं आरडीएक्स पण समुद्र मार्गाने आलं होतं. पण आपण महाराजांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं.
– कोकणावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, इतकं वैविध्य असलेलं कोकण. इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काहीच घेणंदेणं नाही.
– माझा मुद्दा इतकाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर १०,००० कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचं खरं स्मारक आहे, त्यांचं आधी संवर्धन करा. पण माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला.
– 2014 च्या आधी तेव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार अशी घोषणा केली. मी त्यावर काय बोललो हे लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा ह्या पुतळ्याला विरोध आहे.
– मी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं वाटतं तुम्हाला? बरं हे बोलणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार हे महाराजांचं नाव घेत नाही आणि हे मला बदनाम करणार.
– आपल्या पायाखालून जमीन निघून जात आहे तरी कोकणातील माणसाला कळत कसं नाही की शेकडो एकरांचे व्यवहार होत आहेत.
– लोकप्रतिनिधींना माहीती असते कुठे प्रकल्प येणार, मग तेच जमिनीचे व्यवहार करून हजारपट नफा कमवतात.
– लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र तुमच्याकडून कवडीमोलाने जमीन घेतात आणि सरकारकडून भरमसाट पैसे घेतात.
– शरद पवार यांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्याची घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार.