जामखेड (प्रतिनिधी) : कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे अल्पकालावधीसाठी स्थलांतरीत झालेल्या व निराधार,मजुर, हातावर पोट असणाऱ्या कर्जत-जामखेडच्या लोकांना आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातुन सुमारे पाच ट्रक धान्य आज (रविवार दि.१२ रोजी) कर्जत येथे पोहोच झाले. मतदारसंघातील हजारो गरजू लोकांना साधारणतः सात ते आठ दिवस पुरेल एवढे हे गहू व डाळ असे हे जीवनावश्यक धान्य कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे व त्यांच्या विभागाकडे पोहोच करण्यात आले आहे.
ज्यांना आवश्यता आहे अशा लोकांना प्रशासनाच्या माध्यमातुन हे धान्य वितरीत करण्यात येणार आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक लोकं आहे त्या ठिकाणी अडकून पडले आहेत.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणेही शक्य नाही त्यामुळे जगण्यासाठी अत्यावश्यक असलेले धान्य उपलब्ध होणे कठीण होऊन बसले आहे आणि उपलब्ध झालेच तरी सध्या लॉकडाऊनच्या कालावधीत धान्य विकत घेणे व बाहेरून आणणे सहजशक्य नसल्याने अशावेळी आमदार पवार यांच्या माध्यमातून घरपोच होणाऱ्या या धान्यामुळे हजारो गरजूना दिलासा मिळणार आहे.
लॉकडाऊनचा कालखंड संपेपर्यंत कर्जत-जामखेडमधील गरजू लोकांची भुक काही दिवस का होइना भागणार आहे.कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेत असताना आ.पवार यांच्या माध्यमातुन त्यासंदर्भात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत.कोणताही राजकीय दिखावा न करता एवढी मोठी मदत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.ज्यांना शिधापत्रिका आहे किंवा नाही,जे लोकं धान्यापासून वंचित राहतात त्या वंचित,गरीब लोकांनादेखील प्रशासनाकडुन हे धान्य वाटप होणार आहे.आता गरजू लोकांना आपत्तीच्या काळात जीवनावश्यक असलेल्या धान्याची व्यवस्था केल्याने ऐन संकटकाळात आमदार रोहित पवार यांचे असेही दातृत्व पुन्हा समोर आले आहे.
आपली मदत प्रशासनाकडे सुपूर्द करा : आ.रोहित पवारांचे आवाहन
अनेकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत असुन याचे कौतुक आहे मात्र ही मदत तहसीलदार,प्रांताधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली तर शिधापत्रिकेअंतर्गत कोणाला धान्य मिळणार आहे? व कोणाला मिळणार नाही? याची खात्री त्यांना असते त्यामुळे गरजुंनाही धान्याची मदत होईल.गर्दीपासुन होणारा कोरोना रोगाचा धोकाही कमी होईल.ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापल्या परीने गरजुंसाठी मूठभर धान्य प्रशासनाकडे नेऊन द्या. अशावेळी आता मदतीसाठी पुढे येणं खुप गरजेचे आहे असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.