पसंतीसाठी व्हाट्सअपवर पाठवणार फोटो
पुणे – रत्नागिरी हापूस म्हटल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. लॉकडाऊनमध्ये फळांचा राजा असलेल्या आंब्याची चव चाखायची इच्छा झालीय.तर होय, तुमच्या सोसायटी, घरपोच आंबा मिळू शकतो. सोसायटी, घरी अथवा किरकोळ व्यापाऱ्यांनी किमान 10 पेटी घेतल्यानंतर शहरात हव्या त्या ठिकाणी वाहतूक खर्च न आकारता आंबा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी सांगितले.
सुरुवातीला यावर्षी लांबलेल्या पावसाचा फटका आंब्याच्या पिकाला बसला. परिणामी, नेहमीच्या तुलनेत एक महिना विलंबाने कोकणातून मार्केट यार्डात आंब्याची आवक झाली. त्यानंतर तुरळक प्रमाणात आवक होत होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नेहमीच्या तुलनेत पुण्यात आंब्याची कमी आवक होत आहे. मार्केट यार्डातील फळ विभाग सध्या बंद आहे. अनेकांना आंबा खाण्याची इच्छा आहे. मात्र, लॉक डाऊनमुळे उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्याचे काची यांनी सांगितले.
ते म्हणाले, अक्षय तृतीया अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अक्षय तृतीयेला आमरस केला जातो. दरवर्षी या काळात आंब्याला मोठी मागणी असते. त्यामुळे आंबा घरपोच करण्याची ही योजना आहे. मात्र यासाठी सोसायटी, घरगुती ग्राहक अथवा किरकोळ विक्रेत्यांनी किमान दहा पेटी आंबा घेणे आवश्यक आहे. शहरात सध्या तीन ते चार हजार पेटीची आवक, होत असून सध्या चार ते सात डझनाच्या पेटीस दर्जानुसार 1800 ते तीन हजार रुपये भाव मिळत आहे. इच्छुकांनी 9822543041 या क्रमांकावर संपर्क साधावा. तेथून ग्राहकांना व्हाट्सअप वर आंब्याचे फोटो पाठवले जाणार असून, आंबा पसंत आल्यानंतर त्यांना आंब्याची डिलिव्हरी देण्यात येणारा आहे. वाहनातून मोफत डिलिव्हरी दिली जाणार आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा ,असे आवाहन काची यांनी केले आहे.