पुणे – पुणे शहरात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धे नांदेडचं प्रतिनिधीत्व करणारा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पैलवान शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अंतिम सामन्यात शिवराजने महेंद्र गायकवाडला आस्मान दाखवून विजय मिळवला. मात्र ही स्पर्धा संपल्यानंतर आता एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पैलवान सिकंदर शेख याची पैलवान महेंद्र गायकवाड याच्यासोबत कुस्ती झाली होती. आणि या स्पर्धेत सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरून सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, पैलवान सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचा जाब विचारल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांच्या विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आलीय. परंतु, संग्राम कांबळे यांनी कोणालाही धमकी दिली नाही, असे पैलवान सिकंदर शेख याने म्हटले आहे. शिवाय माझ्यावर झालेला अन्याय संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय, असेही सिकंदर शेख याने म्हटले आहे.
सिकंदर शेख याने म्हंटले आहे की, टांग मारताना ज्या नियमाने गुण द्यायला पाहिजे तसे झाले नाही. व्हिडीओ सर्व बाजुंनी पाहू दिला नाही. कोच यांनी दाद मागितली पण त्यांना देखील काही बोलू दिले नाही. जिथे टांग लागली आहे तिथे पूर्णपणे टांग बसलेली नाही. पूर्ण पाठीवर न पडता मी एका खांद्यावर पडलोय. त्यामुळे महेंद्र गायकवाडची अॅक्शन होती म्हणून त्याला दोन गुण देणे अपेक्षित होते आणि माझा कब्जा आहे म्हणून मला एक गुण देणे अपेक्षित होते. परंतु, असे न होता पंचांनी महेंद्रला चार गुण दिले. त्यावेळी माझ्या कोच यांनी दाद मागितली. परंतु, त्यांना काही न बोलू देता तेथून परत पाठवले. चॅलेंज सक्सेस झाले असे माझ्या कोचला सांगितले. परंतु, चॅलेंज सक्सेस झाले असे सांगितले जात असेल तर मग महेंद्रला चार गुण कसे दिले? शिवाय फक्त समोरचाच व्हिडीओ का दाखवला? मागील कॅमेऱ्याचा व्हिडीओ का दाखवला नाही. मी तशी मागणी देखील केली होती.
दरम्यान, मुंबई पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारूती सातव यांना फोन केला होता. त्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये कांबळे हे पंच सातव यांना तुम्ही चुकीचा निर्णय कसा दिला याचा जाब विचारत असल्याचे समोर आले आहे. याची तक्रार पंच यांनी केली असून कांबळे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. सोशल मीडियावर सध्या हे प्रकरण चर्चेत जोरदार आहे. अनेकांनी सिकंदरवर अन्याय झाला असल्याचे मत नोंदवले आहे. तर काहींनी अन्याय झाला नसल्याचे म्हंटले आहे.