नवी दिल्ली – देशामध्ये गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत कोरोना रुग्ण संख्या आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढायला सुरवात झाली आहे. त्याबाबत केंद्रसरकारने चिंता देखील व्यक्त केली आहे. रुग्ण संख्येचा वाढता वेग पाहता आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेत आहेत.
राज्यांना मिळू शकते नवीन नियमावली-
आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 बाबत नियमित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज ही बैठक झाली. त्याचवेळी, पंतप्रधान मोदींनी कोरोनाबाबत सर्व राज्यांशी आढावा बैठक घेतली आहे. करोनाबाबत लवकरच नवीन नियमावलीही जारी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पुदुच्चेरीमध्ये मास्क सक्ती-
दरम्यान, देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये वाढ झाल्याने पुद्दुचेरीमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असून, कोरोना प्रादुर्भावावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी ई. वल्लवन यांनी सांगितले.