पुणे – राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा एकूण निकाल 91.25 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निकाल 2.97 टक्क्यांनी घटला आहे. यंदा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 4.59 टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक तर मुंबई विभागाचा सर्वांत कमी निकाल लागला आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा ऑनलाइन निकाल दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात आला. त्यापूर्वी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावी निकालाची वैशिष्ट्ये पत्रकार परिषदेत सांगितली. यावर्षी 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा दिली. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 6 लाख 84 हजार 118 मुली, तर 6 लाख 8 जार 350 मुलांचा समावेश आहे. उत्तीर्णाची टक्केवारी 91.25 आहे. मुलांचे उत्तीर्णतेची टक्केवारी 89.14, तर मुलींचे 93.73 इतकी आहे.
रिपीटर विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 44.33 टक्के आहे. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 82.39 आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.43 टक्के आहे. विज्ञान शाखेच्या 17 कनिष्ठ महाविद्यालये, कला शाखेतील 31 कनिष्ठ महाविद्यालये आणि 21 कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शून्य टक्के लागला आहे. एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विभागनिहाय निकाल
* कोकण : 96.01
* पुणे : 93.34
* कोल्हापूर : 93.28
* अमरावती : 92.75
* औरंगाबाद : 91.85
* नाशिक : 91.66
* लातूर : 90.37
* नागपूर : 90.35
* मुंबई : 88.13
शाखानिहाय निकाल (टक्केवारीत)
* विज्ञान : 96.09
* कला : 84.05
* वाणिज्य : 90.42
* व्होकेशनल : 89.25
शाळा अथवा कॉलेज : शंभर टक्के निकालाची संख्या
* विज्ञान शाखेच्या शाळा : 2369
* कला : 775
* वाणिज्य : 1050
* व्होकेशनल : 139
“नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार असल्याची माहिती चुकीची असून परीक्षा नियमितपणे होणार आहेत. मात्र, राज्य सरकारच्या धोरणानुसार परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमात बदल होतील. परंतु, बोर्ड परीक्षा पद्धत बंद होणार नाही.’
– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ