Arvind Kejriwal meets Sharad Pawar – दिल्लीतील केजरीवाल सरकार विरुद्ध केंद्रातील मोदी सरकार यांच्यातील वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच, दिल्ली सरकार व उप राज्यपाल यांच्या अधिकारक्षेत्रांबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला होता. यानंतर केंद्र सरकारतर्फे अध्यादेश काढण्यात आला आहे. या अध्यादेशाद्वारे दिल्ली सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अधिकार मोदी सरकारने पुन्हा एकदा उप राज्यपालांना बहाल केल्याचा आरोप आम आदमी पक्षातर्फे करण्यात येतोय.
या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊ नये यासाठी केजरीवाल सध्या देशभरातील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांनी आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील वाय बी सेंटर येथे भेट घेतली. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी, २०२४ मध्ये मोदी सरकारला पुन्हा सत्तेत न येऊ देण्याची पूर्वपरीक्षा राज्यसभेत होईल असं म्हणाले.
काय म्हणाले केजरीवाल?
केंद्र सरकारने दिल्लीबाबत काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊ नये यासाठी केजरीवाल प्रयत्न करत आहेत. यासाठी अध्यादेश राज्यसभेच्या पटलावर मांडल्यानंतर तो पास होऊ द्यायचा नाही अशी योजना आहे. लोकसभेत भाजपला हा अध्यादेश मंजूर करून घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही मात्र राज्यसभेत भाजपला बहुमत नसल्याने येथे अध्यादेश मंजूर करून घेणे भाजपसाठी काहीशे अडचणीचे आहे.
याबाबत बोलताना केजरीवाल यांनी, ‘जर हा अध्यादेश विरोधकांनी एकत्र येत, राज्यसभेत मंजूर होऊ दिला नाही तर २०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींचा पराभव पक्का आहे’ असा दावा केजरीवाल यांनी केला.
मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधींनाही भेटणार | Arvind Kejriwal meets Sharad Pawar
यावेळी केजरीवाल यांना आपण काँग्रेस नेत्यांना भेटला नाही, तुम्हाला विरोधकांच्या आघाडीत काँग्रेस नकोय का? असा सवाल विचारण्यात आला यावर उत्तर देताना त्यांनी, आपण उद्या दिल्लीला जाणार असून गेल्यानंतर या संदर्भांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भेटीसाठी वेळ घेणार असल्याचे सांगितले.
२०२४ लोकसभा निवडणुकांपूर्वी घडामोडींना वेग
देशात लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. विरोधकांची एकजूट करणे, तिसऱ्या आघाडीची शक्यता पडताळणे असे प्रयोग विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सध्या सुरु आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपने देखील २०२४ मध्ये पुन्हा येण्यासाठी जोरदार प्लॅनिंग सुरु केले आहे. एनडीएतील आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न भाजपतर्फे करण्यात येतोय.