Farmers Protest | एमएसपीसह विविध मागण्यांसाठी काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेदरम्यान अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. परिणामी हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने इंटरनेट सेवेवरील निर्बधांचा २४ फेब्रुवारीपर्यत कालावधी वाढवला आहे.
पंजाबमधील पतियाळा, संगरूर आणि फतेहगढ साहिबसह काही भागातील इंटरनेट सेवा 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगित असणार आहे. शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘दिल्ली चलो’ शेतकरी आंदोलन सुरु असल्यामुळे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान सुरुवातीच्या काळात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. मात्र, शेतकरी आंदोलनाची धार पाहून त्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे चोवीस फेब्रुवारीपर्यंत पंजबामधील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. मंत्रालयाच्या 16 फेब्रुवारीच्या निर्देशानुसार, मोहाली, भटिंडा, मुक्तसर, मानसा आणि इतर प्रदेशांमधील निवडक क्षेत्रांसह, पतियाळा, संगरूर आणि फतेहगढ साहिब जिल्ह्यांतील विविध पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात इंटरनेट सेवा खंडीत राहतील.
दरम्यान, पंजाबमधील शेतकऱ्यांनी मंगळवारी त्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाला सुरुवात केली. परंतु पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. तेव्हापासून आंदोलक शेतकरी सीमेवर तळ ठोकून आहेत.