नवी दिल्ली – राजस्थानमध्ये एकत्रितपणे लढून कॉंग्रेसला विजयी करणे हे आमचे सामूहिक उद्दिष्ट आहे. विजय मिळाल्यानंतर राज्य सरकारचे नेतृत्व कुणी करायचे याविषयीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी गुरूवारी म्हटले. त्याकडे राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भुषवत असणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या भूमिकेला उत्तर म्हणून पाहिले जात आहे.
माझी मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा आहे. मात्र, ते पदच मला सोडायला तयार नाही. बहुधा, भविष्यातही पद मला सोडणार नाही, असे गेहलोत यांनी मागील आठवड्यात म्हटले. त्याविषयीचा प्रश्न दिल्लीतील पत्रकार परिषदेत पायलट यांना विचारण्यात आला. त्यांनी उत्तरादाखल कॉंग्रेसश्रेष्ठी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेत असल्याच्या पक्षातील प्रथेकडे लक्ष वेधले.
कॉंग्रेसला कुठल्याही राज्यात बहुमत मिळाल्यानंतर पक्षश्रेष्ठी आणि नवनिर्वाचित आमदार नेत्याची निवड करतात, असे त्यांनी म्हटले. त्यांचे वक्तव्य गेहलोत यांच्या भूमिकेला छेद देणारे आहे. त्यामुळे वरकरणी सर्व आलबेल असल्याचे भासवले जात असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरूच असल्याचे संकेत मिळत आहेत.