गुवाहाटी – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वोच्च उंचीचे नेते आहेत. तेच देशाच्या ईशान्य विभागातील प्रत्येकाची पसंती आहेत. त्यामुळे ईशान्येत येणाऱ्या प्रत्येक पक्षाला मोदींना पाठिंबा द्यावाच लागेल. पाणी महासागरालाच जाऊन मिळते हे सर्व पक्षांनी ध्यानात घ्यावे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी गुरूवारी म्हटले.
नागालॅंड, त्रिपुरा आणि मेघालय या ईशान्येतील तीन राज्यांत नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या. तिन्ही राज्यांत भाजपने मित्रपक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले. नागालॅंडमध्ये तर विरोधी पक्ष ही संकल्पनाच नसेल. त्या राज्यातील इतर सर्व पक्षांनी राज्य सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. त्या पक्षांमध्ये भाजपला राजकीय विरोध असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि जेडीयूचाही समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी नागालॅंडमधील राजकीय स्थितीविषयीचा प्रश्न विचारला.
त्यावर ईशान्येतील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या सर्मा यांनी वरील शब्दांत उत्तर दिले. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू परतण्याची शक्यता असल्याचे संकेत नागालॅंडमधील घडामोडी देतात का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सर्मा यांनी नितीश यांना शाब्दिक टोमणा मारला. नितीश यांच्याविषयी मी फारसे संशोधन केलेले नाही. मात्र, त्यांच्याविषयी कुठली गॅरंटी देता येत नाही, असे ते म्हणाले.