आळंदी – करोनासारख्या महामारीमुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. यंदासुद्धा आषाढी पायी पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आली नाही. फक्त 40 वारकऱ्यांना एस. टी. महामंडळाच्या बसने माऊलींच्या चल पादुका सोबत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या निर्णयाला हभप बंडातात्या कराडकर यांनी विरोध केला असून, आळंदीमधून पायी वारी वारकरी करणारच असल्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला समस्त आळंदीकर ग्रामस्थांनी विरोध केला असून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने ज्या निमंत्रित वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. त्यांचेच आळंदीकर स्वागत करतील.
आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांना निवेदन देऊन हभप बंडातात्या कराडकर यांच्या निर्णयाचा जाहीर विरोध केला आहे. राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसारच पालखी सोहळा पार पाडला जाणार आहे, या भूमिकेवर आळंदीकर ठाम आहेत.
याप्रसंगी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, भैरवनाथ उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, उपनगराध्यक्ष सागर बोरुंदिया, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, हभप चैतन्य महाराज कबीर, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, अशोक उमरगेकर, योगेश कुऱ्हाडे, नितीन साळुंके, अनिल जोगदंड, संतोष भोसले, गोविंदा कुऱ्हाडे, संदीप नाईकरे उपस्थित होते.
संचारबंदीमुळे आळंदी निर्मनुष्य –
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण आळंदी शहर, माऊली मंदिर परिसर, इंद्रायणी घाट आदी ठिकाणचे रस्ते पोलीस प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले आहेत. नियमित होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे आळंदीला येणाऱ्या वाहनांची संख्या देखील रोडावली आहे; मात्र अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडणाऱ्र्या नागरिकांना पोलीस त्यांची वाहने शहरांमध्ये सोडत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
आळंदीला निर्मनुष्य असे स्वरूप गेल्या दोन दिवसांपासून आले आहे. उद्या शुक्रवार व शनिवारी या दोन दिवसांत अशीच परिस्थिती राहणार आहे. या पालखी सोहळ्यात गतवर्षीपेक्षा कडेकोट बंदोबस्त ठेवला असल्याचे चित्र आळंदीमध्ये आहे.