आळंदी (पुणे) – आळंदीची कार्तिकी वारी व संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडावा, अशी स्पष्ट भूमिका आळंदीकर ग्रामस्थांनी घेतली आहे. याबाबत ग्रामस्थांनी संस्थान कमिटीला निवेदन दिले आहे.
यंदा संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीत दाखल होत असतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही कार्तिकी वारी व समाधी सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावा अशी भूमिका आळंदीकर ग्रामस्थांनी घेतली आहे.
कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (8 डिसेंबर) पासून भरणार आहे. कार्तिकी एकादशी (11 डिसेंबरला) तर संजीवन समाधी सोहळा दिन कार्तिकी वद्य त्रयोदशी (13 डिसेंबरला) आहे. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर असा हा आळंदीचा कार्तिकी वारी सोहळा असणार आहे.
वारीला येणाऱ्या वारकऱ्यांमुळे आळंदीकर ग्रामस्थ तसेच वारकऱ्यांद्वारे राज्यातील इतर गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये यामुळे यंदाचा सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थिती व्हावा, असे मत आळंदीकर ग्रामस्थांनी दैनिक प्रभातशी बालताना मांडले.
यावेळी शंकरराव कु-हाडे पा. (भैरवनाथ उत्सव कमिटी अध्यक्ष), नंदकुमार वडगावकर, गणपतराव कु-हाडे (माऊलींचे मानकरी), संदीप नाईकरे, माऊली दिघे, शिवाजी सुर्वे, सुदीप गरूड, रमेश कारले, ज्ञानेश्वर कु-हाडे उपस्थित होते.