आळंदी – शहरात अपघाताची मालिका सुरुच आहे. गेल्या चार दिवसांत गतिरोधकाचा अंदाज न आल्याने 10पेक्षा अधिक अपघात झाले आहे.
आळंदी हे राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र आणि आजूबाजूला एमआयडीसी परिसर असल्यामुळे येथे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. जड वाहतुकीसह इतर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी प्रमुख चौकात आणि उताराच्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने गेल्या काही दिवसांत शहरात अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्याला आळा घालण्यासाठी प्रशानसाने पाऊले उचलत गेल्या महिन्यात दिवसा जड वाहतूकीस बंदी आणि आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. तसेच आवश्यकतेनुसार सोमवारी (दि. 7) देखील काही ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. मात्र त्यावर पांढरे पट्टे न ओढल्यामुळे गतिरोधक लांबून दिसत नसल्याने आता अपघात कमी होण्याऐवजी चार दिवसातच दहापेक्षा जास्त अपघात झाले आहेत.
सर्पमित्र किशोर सुर्यवंशी हा तरूण साप पकडण्यासाठी चालला असता त्याला गतिरोधक न दिसल्याने सोमवारी रात्री (दि.7) त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्याप्रमाणेच इतरही काही जणांचा गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अपघात झाला आहे. गतिरोधक लांबून दिसण्यासाठी त्यावर पांढरे पट्टे ओढण्याची नाकरिकांकडून मागणी होत आहे. दरम्यान, आळंदी वाहतूक पोलिसांनी शहरात दिवसा जड वाहतूकीस बंदी घातली; शहरात येणाऱ्या रस्त्यांवर जड वाहतूकीस बंदी असल्याचे फलक लावण्यात आले. काही दिवस त्याठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली; मात्र तरीदेखील शहरात दिवसा जड वाहतूक सुरुच असल्याचे चित्र आहे.
“सर्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसवले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यावर तात्काळ पांढरे पट्टे मारण्यास सांगितले आहे.”
– अंकुश जाधव (मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद)