मुंबई – राज्यातील विद्यमान सरकारला पाठिंबा असणाऱ्या आमदारांची संख्या 200 वर पोहचली आहे. राज्य सरकारला असे घवघवीत पाठबळ 51 वर्षांच्या खंडानंतर मिळाले आहे. पुन्हा उपमुख्यमंत्री बनलेल्या अजित पवार यांनी घडवलेल्या राजकीय भूकंपाचा इफेक्ट त्यासाठी कारणीभूत ठरला आहे.
अजित पवार यांच्या पाठिशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेमके किती आमदार आहेत ते अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, ती संख्या 36 ते 40 इतकी असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. तो ग्राह्य धरल्यास भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा शिंदे गट यांच्या मिळून आमदारांची संख्या 180 वर पोहचते. त्याशिवाय, लहान पक्ष आणि अपक्षांचा राज्य सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारला किमान 201 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.
याआधी 1972 या वर्षात सरकारच्या पाठिशी असलेल्या आमदारांचे संख्याबळ 222 इतके होते. ते सर्व सत्तारूढ कॉंग्रेसचे सदस्य होते. त्यावेळी विधानसभेचे एकूण संख्याबळ 270 इतके होते. ते 1978 या वर्षात वाढून आता आहे तितके म्हणजे 288 इतके झाले.