कोल्हापूर – जयश्री जाधव यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री जाधव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जयश्री जाधव यांचे अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी, नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव यांनी काल मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. जनतेने तुमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी चांगले काम करा, महाविकास आघाडीचे सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास देत अजितदादांनी जयश्रीताई जाधव यांचे अभिनंदन केले.
या भेटी प्रसंगी गृहराज्यमंत्री सतेज तथा बंटी डी. पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिवसेनेचे पदाधिकारी अरूण दुधवडकर, संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.
कोल्हापूरच्या मैदानात भाजप चितपट, काँग्रेसने मैदान मारलं!
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची नुकतीच पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवार सत्यजीत नाना कदम यांना आस्मान दाखवलं. कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. जयश्री जाधव यांच्या विजयासाठी तिन्ही पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. प्रामुख्याने शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि काँग्रसचे नेते बंटी पाटील यांनी दिवस रात्र एक करत जनतेपर्यंत पोहोचून जयश्री जाधव यांचा प्रचार केला. तिन्ही पक्षांच्या सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर अखेर महाविकास आघाडीने भाजपला कोल्हापूरच्या मैदानात चितपट केलेच…!