चंदीगड – पंजाब सरकारने करोनाबाधितांची वाढती चिंताजनक स्थिती लक्षात घेता आणखी एक पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व शहरांत शुक्रवारपासून रात्री कर्फ्यू असणार आहे. कर्फ्यू संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत लागू असणार आहे. त्याचबरोबर आठवड्याच्या शेवटी लॉकडाऊन केले जाईल.
31 ऑगस्टपर्यंत आपात्कालीन उपाययोजना लागू केल्या जातील. नव्या आदेशानुसार सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर बंदी आहे आणि सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहे. लग्नकार्य आणि अंत्यविधीला यात सूट दिलेली आहे. नव्या घोषणेनुसार सरकारी आणि खासगी कार्यालयांत 50 टक्केच कर्मचाऱ्यांना काम करण्याचे बंधन आहे.
गुरुवारी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी याबाबत घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, करोनाशी असलेली लढाई आता अधिक तीव्र करावी लागणार आहे. ते पुढे म्हणाले की, करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे दुःख होत आहे.
पंजाबमध्ये आतापर्यंत करोनाबाधितांचा आकडा 36 हजार आहे. यात 900 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 12 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. मुख्यमंत्र्यांनी दररोज कमीतकमी 30 हजार करोना चाचण्या करण्याचा आदेश दिला आहे.