नेवासा (प्रतिनिधी) :- बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव बकरीची कुर्बानी देतात, तर आषाढी, एकादशीला वारकऱ्यांचा उपवास असतो. त्यामुळे हिंदू बांधवांच्या भावनांचा अवमान होऊ नये व २९ जून रोजी आषाढी एकदाशी तसेच याच दिवशी मुस्लीम बांधवाचा पवित्र सण बकरी ईदही आहे. त्यामुळे यंदा दोन सणांचा अनोखा संगम पाहायला मिळाला आहे.
हिंदू बांधवांच्या भावनांचे आदर करत नेवासा शहरातील मुस्लीम बांधवांनी यंदा बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी त्या दिवशी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं नेवासा शहरातून व वारकरी संप्रदायातून स्वागत होत आहे.
नेवासा पोलीस ठाण्यात शनिवार (दि.२४ ) रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मुस्लिम समाजाचे शहरातील सर्वच प्रमुख नेत्यांनी ही घोषणा केली.
यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे बोलताना म्हणाले की, नेवासा शहरात माघील काळात काही चुकीच्या गोष्टीं घडल्या आहेत. अश्या प्रकरा मागे विविध समाजातील फक्त दोन टक्के लोक असतात जे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करतात या लोकांना आपणचं जागेवर आणू शकतो. आषाढी एकादशी व पवित्र बकरी ईद एकाच दिवशी आहे. सण उत्सव एकमेकांच्या हातात हात घालून येतात मग आपण देखील अशाच प्रकारे हातात हात घालून एकत्रितपणे सर्व सण उत्सव साजरे करावे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करा, चांगल्या कार्यात बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचा ईशारा यावेळी बोलतांना दिला.
या प्रसंगी जातीय सलोखा समितीचे आसिफ पठाण, बहुजन चळवळीचे नेते संजय सुखदान, युवा नेते ईमरान दारुवाला, नगरसेवक राजेंद्र मापारी, जेष्ठ नेते रहेमानभाई पिंजारी,अब्बास बागवान,साईनाथ लष्करे, जावेद ईनामदार, सुलेमान मणियार, मौलाना तन्वीर, प्रेस क्लब चे अध्यक्ष मोहन गायकवाड, रमेश शिंदे, पवन गरुड, कैलास लष्करें, यांच्या सह शांतता कमिटीचे सदस्य व शहरातील सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .