मुंबई – 29 जून रोजी म्हणजेच उद्या आषाढी एकादशी आणि बकरीद हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जाणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हिंसाचाराच्या घटना पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून पोलिसांकडून या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या बैठकीत हिंदू बांधवांच्या भावनेचा आदर करत आषाढी एकादशीला कुर्बानी न देण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. नेवासा, छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील बुलढाणा शहरातील मुस्लिम बांधवांनीही या दिवशी बळी न देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.
त्यामुळे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये जातीय तेढ निर्माण केला जात असल्याचं दिसून आलं आहे. जातीयवादाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, ही बातमी अतिशय सकारात्मक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी या दोन्ही सणाच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या आहेत.