पुणे (डॉ.राजू गुरव) -महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेचे प्रभारी आयुक्त तुकाराम सुपे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देताना लाखो रुपये लाटले असल्याचे बोलले जात आहे. या गैरव्यवहाराबाबत शिक्षक, कर्मचाऱ्यांकडून चर्चा पुढे येऊ लागली असून, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
शिक्षक, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर त्यांचे वेतन सुरू करण्यासाठी शालार्थ आयडी द्यावे लागतात. पूर्वी सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी देण्याचे काम शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून होत होते. मात्र, यामुळे शिक्षण संचालकांची डोकेदुखी वाढायची. त्यामुळे हे अधिकार कनिष्ठ कार्यालय स्तरावर देण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिकच्या शालार्थ आयडीची प्रकरणे निकाली काढण्याचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक, तर कनिष्ठ महाविद्यालयांची प्रकरणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडे तीन वर्षांपासून देण्यात आलेले आहेत. सुपे यांनी “टीईटी’ परीक्षेत गैरव्यवहार करून कोट्यवधी रुपये मिळवल्याचे उघड झाले आहे. पुण्याबरोबरच नाशिक, मुंबई, कोल्हापूर या विभागांमधील कामकाजाची जबाबदारी असतानाही सुपे यांनी शालार्थ आयडीतून लाखो रुपयांचे घबाड जमविले आहे. शालार्थ आयडीसाठी एजंटाचे रॅकेटही सक्रिय आहे, असेही ठामपणे बोलले जात आहे.
रेट कार्ड होते तयार
सुपे यांच्याकडे पुणे विभागातील 20 टक्के अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची 1 हजार 156 तर 100 टक्के अनुदानित महाविद्यालयांची 26 प्रकरणे सोपविण्यात आली होती. शालार्थ आयडीची प्रकरणे मंजूर करण्यासाठी सुपे यांनी रेट कार्डच तयार करून ठेवले होते. त्यात प्रामुख्याने पन्नास हजारांपासून दीड लाखांपर्यंत समावेश असल्याचे बोलले जात आहे. फाइलवर “वजन’ ठेवल्याशिवाय कोणाचीच शालार्थ आयडीची प्रकरणे मार्गी लागत नव्हती. अन्यथा काहींना काही त्रुटी काढून प्रकरणे प्रलंबित ठेवली जायची, असे शिक्षक, कर्मचारी सांगत आहेत.