डॉ. संजय गायकवाड
करोनाच्या विषाणूचा प्रसार हिवाळ्यात अधिक वेगाने होऊ शकतो, असा इशारा जगभरातील तज्ज्ञांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. उत्सव साजरा करणे ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे. परंतु या परंपरेचे जतन करताना आपण अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.
यंदाच्या नवरात्रोत्सवात करोनाच्या धास्तीमुळे जिथे गर्दी होईल, असे कार्यक्रम रद्द केले आहेत. राजधानी दिल्लीत रामलीलांचे सादरीकरण आणि दुर्गापूजा करण्याची अनुमती दिली असली, तरी काही निर्बंध आहेत. रामलीला आणि दुर्गापूजेसाठी उभारलेल्या मंडपांजवळ मेळे, आकाशपाळणे किंवा
फूड स्टॉल लावण्यास मनाई आहे. गुजरात सरकारच्या नवरात्रातील गरबा खेळण्यासाठी गाइडलाइन आहेत. उत्सवांच्या काळात असे भयभीत आयुष्य आपल्याला पहिल्यांदाच करोनामुळे पाहावे लागत आहे. यावर्षी रक्षाबंधन आणि गणेशोत्सवाचेही रंग फिकेच होते.
आता या भयावह करोना विषाणूची गडद छाया नवरात्र आणि दसरा-दिवाळीवरही पडताना दिसत आहे. रामलीला मंचन आणि दुर्गापूजा या भारताच्या महत्त्वाच्या सांस्कृतिक परंपरा आहेत. हे उत्सव लोकांना आनंदित करतात. रामलीलांचे मंचन हा देशातील लाखो लोकांशी संबंधित सांस्कृतिक आविष्कार आहे. अनेकांचा रोजगार त्यावर अवलंबून असतो. व्यापार आणि बाजारपेठही या महापर्वांशी संबंधित असते. परंतु यावर्षी वातावरण इतके जटिल आहे, की आज आणि उद्या कसा असेल, हे कोणालाच काही सांगता येत नाही.
धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे पालन आपल्याला यावर्षी अत्यंत शिस्तीने आणि संयमाने करावे लागणार आहे, याचा विसर लोकांना पडत आहे. आता हिवाळा सुरू होत आहे आणि हिवाळ्यात विषाणूचा प्रसार वेगाने वाढेल असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकांना सणासुदीच्या काळात बेजबाबदारपणे वागू नये, असा सल्ला दिला आहे. थंडीच्या दिवसांत करोनाचा विषाणू वेगाने फैलावू लागल्यास त्याला थोपविणे अवघड होऊन बसेल. त्यामुळे आताच सर्वांनी संयम आणि शिस्तीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
उन्हाळा येण्यापूर्वी असे सांगितले जात होते की, अतिउष्णतेमध्ये करोनाचा विषाणू जिवंत राहू शकणार नाही. परंतु जेव्हा उन्हाळा सुरू झाला तेव्हा या आशा मावळल्या आणि उन्हाळ्यातही विषाणूचा वेगाने प्रसार होत राहिला. जागतिक आरोग्य संघटनेने आता असा इशारा दिला आहे की, कडाक्याच्या थंडीने करोना विषाणू मरेल, या भ्रमात कुणीही राहू नये. कारण तशी अजिबात शक्यता नाही. आपल्याकडे बहुतांश हंगामी विषाणू थंडीच्या दिवसांत सक्रिय होतात.
उदाहरणार्थ, जगाच्या बऱ्याच मोठ्या भागांत हिवाळ्याच्या दिवसांत एन्फ्लुएन्जाचा प्रसार होताना दिसतो. भारत आणि भारतासारखीच जलवायू स्थिती असलेल्या अन्य देशांत मान्सूनचा पाऊस संपून हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. विषाणूमुळे होणारे आजार, विशेषतः श्वसनाशी संबंधित त्रास हिवाळ्यात वाढताना दिसतात. हे चित्र जगभरात दिसून येते.
म्हणूनच फ्लूच्या विषाणूने सर्वाधिक मृत्यू हिवाळ्याच्या दिवसांत होतात. तज्ज्ञांच्या मते हिवाळ्याच्या दिवसांत करोनाचा विषाणू अक्राळविक्राळ रूप धारण करू शकतो. पाश्चात्य देशांमध्ये अतिथंडीमुळे या दिवसांत लोक आपापल्या घरातच स्वतःला बंदिस्त करून घेतात. परंतु त्यामुळे घरात खेळती हवा न राहिल्याने विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असते.
भारतात मात्र अशी परिस्थिती नाही. थंडीच्या दिवसांतही लोक घराबाहेर पडतात. आपल्याकडील घरांमध्येही हवा खेळती राहण्याची व्यवस्था चांगली केली जाते. पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या ताज्या अहवालानुसार, करोना विषाणू आणि फ्लू अशा दोन्ही विषाणूंच्या तावडीत रुग्ण एकाच वेळी सापडल्यास धोका दुप्पट वाढतो. वयस्कर व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांना तसा धोका सर्वाधिक प्रमाणात असण्याची शक्यता आहे.
थंडीच्या दिवसांत फ्लूपासून लोक स्वतःचे रक्षण करू शकले नाहीत, तर रुग्णालयांमधील गर्दी वाढू लागेल. फ्लू हे एक व्हायरल इन्फेक्शन असून, खोकण्यामुळे आणि शिंकण्यामुळे हा विषाणू पसरतो. कोविड-19 चा आजारही अशाच प्रकारे पसरतो. काही दिवसांनी शाळा सुरू होतील. मुलांची काळजी घेण्याची खरी वेळ आता आली आहे आणि मुलांच्या कुटुंबीयांना अधिक सक्रिय राहण्याची गरज आहे.
अशा पार्श्वभूमीवर, सांस्कृतिक परंपरांचे जतन करीत असताना अत्यंत सावध राहण्याची आवश्यकता आहे. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडविण्याचा हा काळ आहे. जर आपण बाहेर गेलो तरीसुद्धा मास्क परिधान करणे, हात स्वच्छ राखणे आणि नाक-तोंड झाकून ठेवणे अत्यावश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालनसुद्धा केलेच पाहिजे. अगदी थोडासा ताप जरी आपल्याला जाणवत असेल, तरीसुद्धा आपण घराबाहेर पडता कामा नये. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर ज्या अँटीबॉडीज् शरीरात तयार होतात त्या पुढील चार ते पाच महिने सक्रिय राहतात. परंतु या अँटीबॉडीज्मुळे रुग्णाला किती सुरक्षितता मिळते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हिवाळ्याच्या दिवसांत खेडोपाडी जर विषाणूचा प्रसार वाढला तर तो रोखणे हे मोठे आव्हान असेल. कारण ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अत्यल्प प्रमाणात आहेत. ग्रामीण भागात आरोग्याशी संबंधित पाच आव्हाने आपल्यासमोर आहेत. पहिली म्हणजे, लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अत्यंत कमी आहे. देशातील दहा टक्के आरोग्य केंद्रांमध्ये तर डॉक्टरच नाहीत. यातील अनेक आरोग्य केंद्रे बिहार आणि उत्तर प्रदेशातील आहेत. रुग्णालयांत खाटांची संख्या कमी आहे. ग्रामीण भागात रुग्णालये अनेक जणांना लांब पडतात आणि वाहतुकीच्या सुविधाही अत्यल्प असतात. अर्थव्यवस्था आपण प्रदीर्घ काळापर्यंत बंद ठेवू शकत नाही, ही गोष्ट खरी आहे.
प्रत्येकाला आपला चरितार्थ चालवायचा आहे, रोजीरोटी कमवायची आहे आणि त्यासाठी कामे सुरू असायला हवीत. तथापि, घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला काही सावधगिरी बाळगावी लागणार आहे, याची जाणीव यापुढे असायलाच हवी. आपली जीवनशैलीच बदलली आहे, हे गृहीत धरून घराबाहेर पडावे लागणार असून, सवयी बदलणे हाच प्रमुख उपाय आहे.
सणासुदीचा आनंदही आपण निरोगी असू तरच घेऊ शकणार आहोत. करोनावरील लस उपलब्ध झालीच तरी देशात सर्वांना एकाच वेळी लस मिळणेही शक्य नाही. प्रत्येकाला लस उपलब्ध होईपर्यंत बराच कालावधी निघून जाणार आहे. त्यामुळेच “जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही,’ हा नारा आपण लक्षात ठेवला पाहिजे.