नागपूर- नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली असून आगामी निवडणुकीत 30 टक्के जागा देण्याची मागणी महाआघाडीतील राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. अन्यथा शहरातील सर्व जागा लढण्याचा इशारा नागपुरातील राष्ट्रवादी शहर अध्यक्षांनी कॉंग्रेसला दिला आहे. त्यामुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात महाआघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अजून सव्वा वर्षांचा कालावधी आहे. पण आतापासूनच वेगवेगळ्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. नुकतंच नागपुरात प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर उपस्थित होते. या बैठकीत कॉंग्रेसवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
आघाडीत कॉंग्रेसला आतापर्यंत सन्मानाने वागणूक दिली आहे. त्यामुळे येत्या मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला 30 टक्के जागा द्या, अन्यथा सर्व जागा लढू आणि ताकद दाखवू, असा इशारा अनिल अहिरकर यांनी आक्रमक होत कॉंग्रेसला दिला आहे.
नागपुरात राष्ट्रवादीने गृहमंत्रीपद दिले आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्ष मजबूत झाला आहे. त्यामुळे जर 30 टक्के जागा मिळाल्या नाही, तर सर्व जागा लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.