– अरुण गोखले
सुखाच्या मृगजळामागे धावणे हा तर माणसाचा स्वभावच आहे. वास्तविक त्याला खरं सुख, समाधान, आनंद हवा असतो. तो मिळवण्याची त्याची सतत धडपड चालू असते. तो त्याला हवं असणारं सुख,
समाधान, आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये शोधण्याचा, त्यातून मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि म्हणूनच ते त्याला नेमकेपणाने मिळत नाही. खऱ्या आनंदाची, सुखाची, समाधानाची जागा ही नेमकी कुठे आहे? त्याची नेमकी वाट कोणती आहे?
हे त्या वाटेने गेलेल्या साधू-संतांना आणि एकनिष्ठ भगवद भक्तांनाच माहीत असते. त्यामुळेच अशा जीवास ते असा बोध करतात की-
सुखालागी करिसी तळमळ। तरी तू पंढरीसी जाई एक वेळ।।
किंवा जाय जाय तू पंढरी। होय होय वारकरी।।
ज्यांनी ती पंढरीची वारी केली आहे. ज्यांनी ते सावळे रूप पाहिले आहे. ज्यांनी त्या वारीच्या प्रवासाचा, भजनानंदात नाचण्याचा, मुक्त जीवनानंद घेण्याचा अनुभव घेतला आहे तेच त्याबद्दल तेवढ्या अधिकार वाणीने सांगू शकतात.
कारण त्या पंढरीच्या वारीतला वारकरी हा वास्तविक तुमच्या आमच्या सारखाच संसारी, प्रापंचिक, घरादाराचा, लेकराबाळाचा असतो. त्यालाही अनेक चिंता, विवंचना, अडचणी असतातच. पण तरीदेखील तो आपला सारा भार त्या एका पंढरीनाथावर घालून प्रपंच्यातून आवडीने सवड काढून वारीस जातो.
तेव्हा त्याला काय आपल्या मागे घर प्रपंच्याचे, शेतीवाडीचे, नोकरी-धंद्याचे, कामाचे काय होईल ह्याची चिंता नसते का? असतेच ना. तरीपण तो ते सारं बाजूला सारून त्याची जबाबदारी त्या विठ्ठलावर घालून हा आपला आहे ना तो पाहून घेईल, या आणि अशा दृढ विश्वासावरच आपली पंढरीची वारी करीत असतो.
बरं ह्या पंधरा दिवसांच्या वारीच्या वाटचालीतही त्याला अनेक प्रसंगांना, अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. ऊन, थंडी, वारा, पाऊस, शारीरिक कष्ट यांच्याशी सामना करावा लागतो. तरीसुद्धा त्या सर्वांवर वार करीत, ते आघात, ते कष्ट त्या हरिनामाच्या भजनानंदात आनंदाने सहन करीत तो पंढरीस जातो.
त्या सावळ्या पंढरीनाथाची भेट घेतो. त्याच्या समचरणावर वारकरी हा जेव्हा आपला माथा टेकवितो. तेव्हा तो आनंदाचा कंद त्या आपल्या प्रत्येक भक्त भाविकाच्या मनात “मी वारी पूर्ण केली, मी वारकरी झालो” हा खरा सुखानंद बांधून देतो.