असंख्य कल्पनांना, कलागुणांना, संघर्षाला साद घालत आयुष्य जगणारा, भावाबंधनांचे खेळ खेळणारा असा हा माणूस.
णसाला माणसाने समजून घेणे हे खरं तर कोणाला न उलगडलेले कोडे आहे. प्रत्येक माणसाची जडण-घडण वेगळी, समाज वेगळा, देश, भाषा वेगळे तरी तो माणूस म्हणून ओळखला जातो. कधी मनाला न सावरणारा सैरभैर, तर कधी मनाला सावरणाराही, तर कधी मनाच्या गाभाऱ्यात उत्तुंग शिखर गाठण्याचे ध्येय बाळगणारा माणूसच. खरे तर माणूस समाज प्रिय आहे.
प्रत्येक सजीवाला आपल्यासारखे दिसणारे, आपल्यासारखं दैनंदिन जीवन जगणारे, सगळ्यांचा एकसारखा खानपान असणारे, आपल्यासारखे वागणारे, आपले विचार समजणारे व दुसऱ्याचे विचार आपल्याला समजणारे असा कळप म्हणजे समाज. माणूस कळपाने राहणारा आहे. प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या नात्याने बांधला गेलेला असतो.
जन्मापासून बाळाला वाढवताना घरातील माणसांबरोबर इतरही जण बाळाच्या संगोपनासाठी जोडले जातात. जसे की, बाळाला अंघोळ घालणारी बाई, डॉक्टर, नर्स, नातेसंबंधातील, मित्रपरिवार तसेच पुढे शाळेतील शिक्षक, वर्गमित्र, शाळेतील काम करणाऱ्या आया, शाळेचे बस चालक, शाळेतील वर्ग मित्रांचे आई-वडील, प्रत्येक इयत्तेत बदलणारे शिक्षक, मित्रांचा सहवास, पुढे कॉलेजमधील प्राध्यापक त्या अनुषंगाने येणारे कॉलेजमधील सर्व कर्मचारी वर्ग, मित्र, यामध्ये काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. परत नव्याने वेगळी माणसं आपल्या आयुष्यात प्रवेश करत असतात, तर काही विस्मृतीत जातात.
काही क्षणासाठीच्या नात्याला आपण नव्याने नाव देऊन नातं निर्माण करतो तर जन्मानेच बांधले गेलेल्या नात्यांमध्ये दुरावाही येतो. काही अबोल होतात, काहींचा सहवास संपलेला असतो, तर काही माणसे काही वेळेस नकोसे वाटतात. प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात प्रत्येक व्यक्तीबद्दल वेगवेगळ्या भावना दडलेल्या असतात. काहींबद्दल प्रेम असतं तर काहींबद्दल आदर, आपुलकी वाटते. माणसागणिक अशा भावना दडलेल्या असतात.
नेहमीचे रस्त्याने दिसणाऱ्या व्यक्ती, दुकानदार हे तेवढ्या क्षणासाठी आपल्या आयुष्यात येतात व जातात. माणूस या नात्याचे ओझे हे वेळ व काळानुसार बदलत जाते. लहानपणी आपल्याला सांभाळणारे आजी-आजोबा, कालांतराने त्यांना सांभाळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर येत असते. यामध्ये आई-वडिलांनाही हा नियम तितकाच लागू होतो. लग्न झाल्यानंतर परत नव्याने नाती जोडली जातात.
नव्याने नवीन माणसे परत आयुष्यात येतात. घरामध्ये असंख्य लोक एका व्यक्तीबरोबर जोडली जातात. हे माणसांचं येणं आणि जाणं त्याच्याशी असलेली आपली भावनिक गुंतवणूकही वेगळीच का असते, हे काहीच आपण सांगू शकत नाही. काही नात्यांमध्ये आपले गुपित, रहस्यही उलगडले जातात, जसे जवळचा मित्र. तर नात्यांमध्येच रहस्याचा बांध बांधला गेलेला असतो.
कोणी धोका देतो, तर कोणी आपुलकीचा व प्रेमाचा धागा तयार करतो. इलेक्ट्रॉनिक जमान्यातही संगणक, दूरभाष्य, ई-मेल, फेसबुक, व्हॉट्सऍप अशा अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमातूनही व्यक्तींच्या नात्यांचा विकास अगणित वाहत असतो. अशा अनेक व्यक्तींची टोपण नावं, आडनाव, कंपनीचे नावावरून व्यक्ती, अशा एक ना अनेक नावांवरून ती व्यक्ती तिथेही जोडली जाते. नावावरूनच प्रत्येकाचा डाटा सेव्ह केलेला असतो.
माणसांचा चेहरा न बघता आपण त्यांच्याशी संवाद साधलेला असतो. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी एक वेगळेपण असते. सगळ्या गुण-दोषांना स्वीकारून प्रत्येक माणूस ओळखला जातो. या असंख्य व्यक्तींच्या भावदर्शनामध्ये आपण आपल्याला सिद्ध करत असतो. आपल्या एवढ्याशा मेंदूच्या खोबणीमध्ये व्यक्ती नावाच्या महासागराचा साठा साठवलेला असतो, हे खरंच जगातलं महान आश्चर्य आहे.
तंतोतंत चित्र काढणे हे खरं तर कोणालाही कठीणच. पण विधात्याने असंख्य मानवनिर्मित करताना कुठली कल्पना कुठल्या व्यक्तिरेखांना, याचा अभ्यास केला असेल? आयुष्यामध्ये क्षण, तास, दिवस रात्र, आठवडे, महिने, आयुष्यभर असंख्य नात्या गोत्यांना घेऊन आपण प्रवास करत असतो.
आयुष्य जगत असताना कधी कोणाचे मन दुखावतं, तर कोणी कोणाचे मनात जपत असतो. तर कधी संगोपन करतो, तर कधी कोणाला झिडकारत आयुष्य जगत असतो. पण खरं आयुष्य काय आहे? या जीवनामध्ये खरं तर तो एकटाच असतो. आजही न ओळखू शकलेल्या या व्यक्तीला आपण माणूस म्हणूया.
– ज्योत्स्ना पाथ्रीकर