– अरुण गोखले
माणूस हा कित्येकदा त्याच्या अनुभवातून घडत असतो. गोष्ट आहे पाणिनी नावाच्या एका मुलाची. पूूर्वीच्या विद्यार्जनाच्या पद्धतीनुसार तो गुरूंकडे राहून, त्यांची सेवा करून शिकत होता. गुरुजींच्या समोर बसायचे, ऐकायचे, पाठांतर करायचे.
घोकंपट्टी करायची हे सारं त्याला करावं लागे. तो ते सार अगदी मनापासून करतही होता. पण तरीही त्याला संस्कृत भाषा काही येत नव्हती. इतर विद्यार्थी त्याला हसायचे, चिडवायचे. त्यामुळे तो खूप नाराज व्हायचा, दु:खीकष्टी व्हायचा. आपल्या कमकुवतपणाचे त्याला मोठे वाईट वाटायचे.
एकदा तो आश्रम सोडून दूर पळून गेला. फिरत फिरत तो एका खेडेगावात आला. सकाळची वेळ होती. गावच्या महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीवर पाणी भरत होत्या. पाणिनी विहिरीजवळ गेला. पोटभर पाणी पिऊन, तिथेच इकडेतिकडे पाहात उभा राहिला.
तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की, विहिरीजवळच्या दगडांचा काही भाग हा माठांचे बूड व्यवस्थित राहील, असा गुळगुळीत झाला होता. त्या दगडांवरील खुणा पाहून पाणिनीला मोठे कुतूहल वाटले. त्याने त्या पाणी भरणाऱ्या महिलांना विचारले, “हे असे माठ ठेवायला दगड कोणी घडवले?’
त्यावेळी त्या बायकांनी उत्तर दिले, “अरे बाळ, हे दगड मुद्दाम कुणी घडवलेले नाहीत. त्यांना तसा खास आकार कुणी दिलेला नाही. अनेक वर्षांपासून पाणी भरायला येथे लोक येतच आहेत. रोज या दगडांवर माठ ठेवले जात आहेत. माठांची बुडे घासून घासून या दगडांना हे आकार प्राप्त झाले आहेत.’
ते उत्तर ऐकले आणि पाणिनी मनाशी विचार करू लागला की, जर ठिसूळ माठ कठीण दगडाशी वारंवार घासले जाऊन त्या कठीण दगडाला घडवतात, मग मी तर माणूस आहे. मी का हार मानावी, मी जर प्रयत्न केले, मेहनत घेतली, तर मलाही संस्कृत भाषा यायला हवी.
संस्कृत भाषा शिकण्याचा त्याने निश्चय केला. लगेचच पाणिनी आश्रमात परत आला. त्याने खूप कष्ट घेतले, अभ्यास केला. संस्कृत भाषेत ते लिहू लागले, बोलू लागले. त्यांनी खूप मोठे ग्रंथ लिहिले.
संस्कृत भाषा कशी लिहावी, कशी बोलावी, त्यासाठी कोणते नियम वापरावेत हे त्यांनी सर्व जगाला शिकविले. पुढे ते संस्कृत भाषेचे व्याकरणकार झाले. पाणिनींप्रमाणेच आज प्रत्येकाने विचार करून आपल्या पुढील जीवनाला आकार दिला पाहिजे.