आजकाल आपलं जीवन हे इतक्या नानाविध समस्यांनी भरलेले आहे की, आजच्या मितीला आपल्याला देवाप्रमाणेच खऱ्या मार्गदर्शकाची गरज आहे. आता इथे मात्र विचार करावा लागतो आणि असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो की, खरा मार्गदर्शक कोण? जीवनातला खरा वाटाड्या कोण?
तर याचं उत्तर एकच आहे की, खरे मार्गदर्शक ते लोक आहेत की जे स्वत: या सर्व परिस्थितीतून गेले आहेत. ज्यांनी स्वत: त्या समस्यावर उपाय शोधले आहेत. ज्यांना क्षणोक्षणी ढळणारी जीवनातली शांती अन् सुख समाधान हे कसे परत मिळवायचे हे माहीत आहे. ज्यांना त्याचा अनुभव आहे तेच खरे वाटाडे, तेच खरे मार्गदर्शक, तेच खरे द्रष्टे. कारण त्यांच्याकडून होणारे मार्गदर्शन हे अनुभवाच्या खोलीतून, द्रष्टेपणातून आणि त्यांनी राखलेल्या दक्षतेतून आलेले असते.
आपल्या जीवनात आपल्याला अनेक वेळा हे करा, हे नको असे सांगणारे, शिकविणारे अनेकजण भेटतात. हे खरे मार्गदर्शक नसतात, ते असतात सल्लागार. आपल्या जीवनाचं खरंच सोनं व्हावं, असे ज्यांना निरपेक्ष बुद्धीने वाटते ते म्हणजे साधू, संत, सत्पुुरुष आणि सद्गुरू.
मात्र, या लोकांचा आपल्यालाच शोध घ्यावा लागतो. त्यांच्या पायाशी जाऊन आपला मीपणा, अहं, ताठा, गर्व, अभिमान, मीच ज्ञाता हा सारा भाव सोडावा लागतो. त्यांना सेवा, भक्ती आणि श्रद्धेने, निष्ठेने आपलेसे करावे लागते. एकदा का त्यांनी आपल्याला त्यांचा म्हणून स्वीकारले की, मग आपोआप आपली सर्व चिंता तेच करतात.
त्याचं काय आहे, देवळातला देव हा आपल्याशी बोलत नाही. आपलं काही चुकलं माकलं तर सांगत नाही, तुम्ही त्याच्या दर्शनाला जा किंवा जाऊ नका त्याला काही फरक पडत नाही. पण तेच तुम्ही सद्गुरूंकडे गेला नाहीत. सत्संगास दिसला नाहीत. तुमची त्यांची भेट झाली नाही. तर ते तुमची चौकशी करतात. तुम्ही अडीअडचणीत असाल तर तुम्हाला मदतीचा हात पुढे करतात. तुमच्या समस्येवर उपाय सांगतात. तुमच्या चुका वेळच्या वेळी दाखवून त्या दुरूस्तही करून घेतात.
ते आपल्याला व्यवहारात, संसारात, परमार्थात भक्ती साधनेत, काय घ्यायचं, काय सोडायचं हे खुबीने सांगतात, शिकवतात. कारण प्रत्येक जीवाचे ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण व्हावे, ही त्यांच्या मनाची खरी तळमळ असते.