काटेवाडी (बारामती) – काटेवाडी गावच्या नावामध्ये विजय संजय देवकाते यांनी मानाचा तुरा रोवला असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशामध्ये 92 वा क्रमांक मिळवला आहे. तर महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक मिळवला. देवकाते यांच्या यशाबद्दल काटेवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी काटेवाडी गावचे सरपंच विद्याधर काटे, श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, पुणे जिल्हा सह संपर्कप्रमुख अॅड. राजेंद्र काळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, बारामती मार्केट कमिटीचे माजी सभापती संजय काटे, महादेव कचरे, वसंतराव देवकाते, दत्तात्रय काटे, प्रकाश काटे, सोसायटीचे अध्यक्ष स्वप्नील काटे, मिलिंद काटे, शितल काटे, सुभाष वाघ आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
मूळ काटेवाडी (ता. बारामती) गावचे रहिवासी असलेले संजय नामदेव देवकाते हे आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने तेरा वर्षांपूर्वी त्यांच्या आजीची दोन एकर शेत जमीन मिळाल्याने पत्नी रोहिणीसह इंदापूर तालुक्यातील रेडणी या गावी स्थायिक झाले. शेतामध्ये मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करीत होते. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने विजय यास काटकसर करत जीवन जगावे लागले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी व रेडनी या ठिकाणी विजयचे प्राथमिक शिक्षण झाले.
जीवनामध्ये काहीतरी मोठं करायचं या भावनेने मनामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास पुणे येथे करत असताना कोरोनाच्या काळामध्ये पहिल्या लाटेमध्ये वडिलांचे निधन झाल्याने अर्ध्यावरती परीक्षेची तयारी सोडून रेडणी या गावाकडे यावे लागले. परंतु विजयने मनाशी खूणगाठ बांधली होती की मी अधिकारी होणारच व त्या स्वप्नाचा विचार करत विजयने थोड्या कालावधीनंतर पुन्हा पुण्यामध्ये येऊन अभ्यास सुरू केला.
परंतु आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने दिवसातील दोन तास पार्ट टाइम जॉब करत स्वतःचा चरितार्थ चालवत बारा बारा तास अभ्यास केला. जिद्द चिकाटी व परिश्रम या जोरावरती अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगल्याने विजयने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश प्राप्त करून देशामध्ये 92 वा व महाराष्ट्र मध्ये दुसरा क्रमांक मिळाला.
संपूर्ण जगावर अचानक आलेल्या करोनाच्या संकटामध्ये सर्वजण भयभित झाले असताना विजयने पुण्यामध्ये एकटाच रूम मध्ये राहून अभ्यास सुरू ठेवला होता. त्यावेळी ॲम्बुलन्सचा आवाज कानावर आला तर मनामध्ये धडकी भरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेले होते. अशाही परिस्थितीत मनाला धीर देत व काहीही झाले तरी यूपीएसी क्रॅक करायचे स्वप्न असल्याने विजयने हे यश संपादन केले. परंतु या खडतर प्रवासातून हे यश संपादन केले असल्याने आजचा क्षण व आजचा दिवस पाहायला वडील पाहिजे होते. परंतु वडील नसल्याची खंत कायम मनात राहून गेल्याची विजय यांनी बोलून दाखवले.
भविष्यात मी ग्रामीण भागासाठी व देशासाठी कायम काम करत राहणार आहे. जिद्द व चिकाटीने व मनापासून मला माझ्या आयुष्यात जे धेय्य गाठायचे आहे ते पूर्ण करायचे आहे. अशी खून गाठ बांधली तर नक्कीच ग्रामीण भागातील मुले यूपीएसी परीक्षेत यश संपादन करू शकतील.