पाटणा : बिहारच्या राजधानी असलेल्या पाटणा शहरातील पूरग्रस्त भागातून महिला आणि मुलांसह 4,000 हून अधिक लोकांना वाचविण्यात आले, अशी माहिती एनडीआरएफने सोमवारी दिली. संततधार पावसामुळे पाटणा शहरासह बिहारमधील प्रमुख शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाटणा शहरात बचाव व मदतकार्य करण्यासाठी प्रत्येकी 45 जवानांची पाच पथके तैनात केली आहेत. तर संपूर्ण बिहारच्या 14 जिल्ह्यांसाठी “एनडीआरएफ’ची 19 पथके तैनात करण्यात आली आहे.
ज्या 4 हजार जणांना वाचवण्यात आले, त्यामध्ये महिला, रूग्ण, मुले आणि वृद्धांचा समावेश आहे. त्यांना सैन्याने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, असे एनडीआरएफच्या प्रवक्त्याने सांगितले. बहुतेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे लोक घरात अडकले आहेत. शहर व उपनगरी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्य शहरांच्या तुलनेत पाटणाला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. शहरात बचावासाठी बोटींचा वापर करावा लागतो आहे. पूरग्रस्त नागरिकांपर्यंत मदत आणि अन्य साहित्य पोहोचवण्यासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला होता. अन्य शहरांमधील पूरस्थिती सुधारत आहे.