नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ( Nationalist Congress Party) कुणाचा याविषयीचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे. त्या निर्णयाशी संबंधित सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना पाचारण केले आहे.
महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत फुट पडली. तो पक्ष सध्या अजित पवार आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये विभागला गेला आहे.
दोन्ही गटांकडून पक्षावर दावा सांगितला जात आहे. ते प्रकरण निवडणूक आयोगाकडे ( Election Commission) पोहचले आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या रूपाने महाराष्ट्रातील दुसऱ्या राजकीय पक्षाच्या ताब्याविषयीचा निर्णय आयोगाला घ्यावा लागणार आहे. तो निर्णय काय असेल आणि केव्हा येणार याविषयी मोठी उत्सुकता आहे.