मुंबई – राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे “इंडिया’ आघाडीची जागावाटपाची चर्चा थांबलेली असताना शरद पवार यांच्या नेतृत्वखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. शरद पवार गटाकडून राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 12 ते 15 जागांवर दावा करण्यात आला आहे.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली. लोकसभा निवडणुकीत आम्ही 12 ते 15 जागा लढविण्यास इच्छुक आहोत. त्यासाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली असून पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राज्यातील जागावाटपाची चर्चा वेगाने सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी आमचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी अमोल कोल्हे यांची नावे जवळपास निश्चित आहेत. तर रावेर, सातारा, कोल्हापूर, दिंडोरी, बीड आदीसाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करीत आहोत. लोकसभेनंतर विधानसभेसाठीही आम्ही तयारी करीत आहोत. यासाठी उमेदवारांची निवड करून त्यांना पक्षात घेतले जात आहे, असेही पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी जागा वाटपासंदर्भातील कोणतीही बैठक पार पडलेली नाही. त्यामुळे मविआमध्ये लोकसभा जागा वाटप 16-16-16 असा होतो की आणखी काही फॉर्म्युला ठरतो, हे अद्यापही समजू शकलेले नाही. विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. विधानसभेच्या जवळपास 58 मतदार संघातील उमेदवारांची निश्चिती शरद पवार गटाकडून करण्यात आल्याचे समजते. आहे.
निधीवाटप हा सरकारचा अंतर्गत विषय
उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या गटातील आमदारांवर निधीवाटपात कोणता अन्याय होत असेल असे मला वाटत नाही. कोणत्या आमदाराला किती निधी दिला जातो हे काही सांगता येत नाही. निधीवाटप हा सरकारचा अंतर्गत विषय आहे.
कोणत्या आमदाराला किती निधी दिला जातो याबद्दल काही सांगता येत नाही. निधी वाटपाबाबत आजकाल वेगळा पायंडा, प्रथा पडत आहेत. प्रत्येकालाच आपल्या मतदारसंघात जास्तजास्त निधी हवा असल्याचे दिसून येत आहे, असे जयंत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.