पुणे -पाच जिल्हे आणि 58 तालुके असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला पहिल्याच दिवसांपासून गती आली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळे भाजपसमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे. या निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यात तापू लागले आहे. इंदापूर, बारामती, शिरूरसह इतर तालुक्यात येत्या चार दिवसांत आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत.
पुणे मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. पदवीधरांचे प्रश्न आणि त्यांचा सर्वांगिण विकास या मुद्द्यांवर आतापर्यंतच्या निवडणुका होत होत्या. मात्र, गेल्या 20 वर्षांत इच्छुकांना पदवीधराचे दार खुणावू पाहत आहे. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतील इच्छुकांना हा मतदारसंघ सोयीचा वाटत आहे.
त्यामुळे ही निवडणूक आता अटीतटीची होऊ लागली आहे. पुणे शहरातील हक्काचा मतदार आणि त्याभोवती विजयाचे समीकरण, अशी ओळख या निवडणुकीची होत होती. त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ सुरक्षित होता. 2003 पासून या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलत गेली आहेत.
पुण्यापेक्षा जादा मतदारसंख्या ही सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे या जिल्ह्यांनी पुणे शहराला ओव्हरटेक केले आहे. मताधिक्यासाठी हे जिल्हे उमेदवारांना अनुकूल ठरत आहे. याचा प्रत्यय मागील निवडणुकीतही आला आहे. 2010, 2015 मधील निवडणुकाही चुरशीच्या झाल्या होत्या.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्थितीचा विचार करता भाजप आणि राष्ट्रवादीत चुरस पाहावयास मिळत आहे. महा विकास आघाडी सत्तेत आल्यामुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. दौंड, इंदापूर तालुक्याचा अपवाद वगळता इतर तालुक्यात राष्ट्रवादी प्रबळ आहे. शिरूर, बारामती, इंदापूर, खेड, जुन्नर, पुरंदर, भोर या मतदारसंघात राष्ट्रवादी- कॉंग्रेसचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची फळी सक्रिय झाली आहे.
पक्षीय स्थिती कागदावर मजबूत
जिल्ह्यात राष्ट्रवादी- कॉंग्रेसचे आमदार सर्वाधिक आहेत. त्या तुलनेत भाजपकडे दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल आहेत. तसेच इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. हे दोन नेते वगळता जिल्ह्यातील इतर मतदारसंघात भाजपची अवस्था तोळामासासारखी आहे. गेल्या वर्षी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महा विकास आघाडी उदयाला आली आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीला तिहेरी साथ मिळाली आहे. मात्र, यात एकदिलाने आणि समन्वयाने काम केल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवारास पोषक वातावरण मिळू शकते. राष्ट्रवादीकडे पक्षीय स्थिती सध्या मजबूत आहे. ही फौज प्रत्यक्षात रंणगणात सक्रिय झाली तर पोषक वातावरण मिळणार आहे. ही राष्ट्रवादीच्यादृष्टीने कमकुवत दुवा आहे. अन्यथा आघाडीतील शिलेदार कागदावरच मजबूत दिसतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
मतदारसंख्येत पुणे जिल्हा प्रथम स्थानावर
पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या आहे. पहिल्या स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 618 मतदार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 89 हजार 528 मतदार आहेत. त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात 87 हजार 233 मतदार आहेत. सातारा जिल्ह्यात 59 हजार 072 मतदार आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात 53 हजार 813 मतदार आहेत. एकूण मतदारसंख्या ही 4 लाख 26 हजार 264 इतकी आहे. यात राष्ट्रवादीकडून जिल्हा (ग्रामीण), सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पोषक वातावरण असले तरी अटीतटीचे चित्र दिसत आहे.
ग्रामीण भागातील मतदारसंख्या सरस
पुणे मतदारसंघातील 58 तालुक्यांमध्ये इंदापूरची मतदारसंख्या सरस आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदारसंख्या या तालुक्याची आहे. सुमारे 10 हजार 861 मतदार या निवडणुकीत निर्णायक कौल देऊ शकतात. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचे लक्ष इंदापूरकडे लागले आहे.
इंदापूर तालुक्यात प्रचाराची हवा गरम होत आहे. गेल्या तीन दिवसांत पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यात प्रचाराची हवा गरम होत आहे. यात पदवीधरांना चुचकारण्यासाठी गावपातळीपर्यंत नेटवर्क राबविले जात आहे. तसेच पदवीधर मतदारांशी संपर्क साधला जात असून मतदान केंद्रनिहाय यंत्रणा सक्रिय झाली आहे.