चित्रपट उद्योग अत्यंत बेभरवशाचा मानला जातो. अनेकांना वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो तर काहीजण या उद्योगातच उशिरा येतात. काहींना रातोरात स्टारडम मिळतो तर काहींना वर्षानुवर्षे झगडावे लागते. अशाच उशिरा झळकलेल्या कलावंतांची चर्चा येथे करूया.
यशस्वी होण्यासाठी वयाची अट असते का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थीही देता येईल आणि नकारार्थीही. वस्तुतः प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे उत्तर निरनिराळे असते आणि ते प्रत्येकाने स्वतःलाच द्यायचे असते. तुम्ही वयाच्या मागे आशा ठेवता की वयाच्या पुढे धैर्य ठेवता, यावर सर्वकाही अवलंबून असते. म्हणूनच अशा बॉलीवूड कलावंतांची चर्चा या ठिकाणी करूया, ज्यांनी धैर्य आणि आशा यांच्या मदतीने वयाला पराभूत केले आणि यश मिळविले. हे असे कलावंत आहेत, ज्यांनी लहान वयात फिल्म इंडस्ट्रीत येऊन कामाला सुरुवात केली; परंतु यश मिळविण्यासाठी त्यांना अनेक वर्षे झगडावे लागले. याउलट काही स्टार असे आहेत, ज्यांनी बऱ्याच उशिरा बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले आणि रातोरात स्टार बनले. परंतु काहीही असो, या दोन्ही प्रकारच्या लोकांनी एक गोष्ट सिद्ध केली ती अशी की, तुमची मेहनत आणि तुमचे नशीब हे तुमच्या आयुष्याला कधीही कलाटणी देऊ शकते.
पियूष मिश्रा हे प्रतिभेने परिपूर्ण आहेत. त्यांचा अभिनय अप्रतिम आहेच; शिवाय ते लेखक, गायक आणि संगीतकार म्हणूनही खूप प्रसिद्ध आहेत. परंतु इतके हुशार असूनही त्यांना यश मिळायला खूप वेळ लागला. त्यांनी 1988 मध्ये “भारत एक खोज’ या टीव्ही मालिकेपासून करिअरची सुरुवात केली होती. मात्र, बराच काळ त्यांना ओळख मिळू शकली नाही. 2009 मध्ये “गुलाल’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले आणि 2012 मध्ये आलेल्या “गॅंग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटाने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटाच्या वेळी त्यांचे वय पन्नास वर्षांच्या जवळपास होते.
कुमूद मिश्रा हे नाट्य कलावंत आहे. त्यांनी श्याम बेनेगल यांच्या “सरदारी बेगम’ या चित्रपटापासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात ओम पुरी, किरण खेर असे दिग्गज कलावंत असल्याने त्यांना फारशी ओळख मिळाली नाही. दरम्यान, त्यांना चित्रपट मिळणेही बंद झाले; परंतु प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांना खरी ओळख मिळाली ती 2011 मध्ये आलेल्या रणबीर कपूरच्या “रॉकस्टार’ चित्रपटातील खटाना भाईच्या भूमिकेमुळे! या पात्राने कुमूद यांचे नशीब बदलले. आज कुमूद हे बॉलीवूडच्या प्रत्येक बड्या चित्रपटात दिसतात. ज्यावेळी रॉकस्टार चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा कुमूद यांचे वय 41 वर्षे होते.
दिग्गज खलनायक अमरीश पुरी हे एकेकाळी विमा महामंडळात काम करीत असत. ते सुरुवातीपासूनच रंगभूमीशी संलग्न होते; परंतु त्यांनी बॉलीवूडमध्ये काम केले नव्हते. 1970 मध्ये त्यांनी देवानंद आणि वहिदा रहमान यांच्या “प्रेम पुजारी’ या चित्रपटात पहिल्यांदा भूमिका केली तेव्हा ते 40 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. त्यानंतर त्यांनी 1971 मध्ये आलेल्या “रेश्मा और शेरा’ तसेच इतर चित्रपटांमध्ये काम केले. 1984 मध्ये सुप्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या “इंडियाना जोन्स’ या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. परंतु 1987 मध्ये शेखर कपूरच्या “मिस्टर इंडिया’ चित्रपटात त्यांनी साकारलेली “मोगॅम्बो’ची भूमिका प्रचंड गाजली आणि अमरीश पुरी हे बॉलीवूडमधील सर्वांत मोठे खलनायक ठरले.
अभिनेत्री नीना गुप्ता या 1981 पासून चित्रपट उद्योगात सक्रिय आहेत. “वो छोकरी’ या 1994 सालच्या चित्रपटातील एका तरुण विधवेच्या भूमिकेसाठी त्यांना सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र, त्यानंतर त्यांना ना ओळख मिळाली ना भूमिका. परंतु 2018 मध्ये त्यांचे नशीब पुन्हा पालटले. “बधाई हो’ या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यावेळी त्यांचे वय सुमारे 59 वर्षे होते. आता त्यांना चांगल्या भूमिका मिळत आहे आणि त्या सातत्याने बड्या चित्रपटांमधून दिसत आहेत.
रोनित रॉयचा “जान तेरे नाम’ हा पहिला चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला; मात्र तरीही रोनित रॉयला आवश्यक स्टारडम मिळवता आला नाही. अनेक वर्षे त्याला कामही मिळाले नाही. फिल्मी दुनियेत काम न मिळाल्याने रोनित रॉय 2000 मध्ये टीव्हीच्या पडद्याकडे वळला. दूरचित्रवाणीने त्याला घरोघरी ओळख दिली आणि त्याला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय स्टार बनवले. त्याला 2010 मध्ये “उडान’ या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पुन्हा यश मिळाले. त्यावेळी त्याचे वय 40 वर्षांपेक्षा अधिक होते. त्यानंतर तो सातत्याने चित्रपटांमधून दिसत आहे.
बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दिकीने बरीच वर्षे संघर्ष केला. तो एकदा 1999 मध्ये आमिर खानच्या सरफरोश चित्रपटात दिसला होता. त्यातही त्याला केवळ एका मिनिटाची भूमिका मिळाली होती. त्यानंतर अशाच दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या. परंतु 2012 मध्ये “गॅंग्स ऑफ वासेपूर’ने त्याला रातोरात स्टार बनवले. तथापि, त्यावेळी त्याचे वय 38 वर्षांचे होते. रन, अपहरण, ओंकारा आणि रावण यांसारख्या चित्रपट केल्यानंतर अनुराग कश्यपच्या “गॅंग्स ऑफ वासेपूर’ने पंकज त्रिपाठी या कलावंतालाही मोठी ओळख दिली. सुलतानच्या भूमिकेत त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी त्याचे वय 36 वर्षांच्या आसपास होते. आज अगदी लहान मुलेही त्याला कालीन भैय्या नावाने ओळखतात.
बोमन इराणी यांनी चित्रपटांमध्ये खूप उशिरा एन्ट्री केली आणि त्यांना पडद्यावर बघताच प्रेक्षक थक्क झाले. त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी राजू हिरानी यांच्या “मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. “मै हूँ ना’ पासून “थ्री इडियट्स’ पर्यंत प्रत्येक भूमिकेत त्यांनी चमत्कार केले. आज प्रेक्षकांच्या आवडत्या कलावंतांपैकी ते एक आहेत.
संजय मिश्रा हेही दीर्घकाळ बॉलीवूडमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करत राहिले. प्रत्येक भूमिकेत ते लोकांना आवडलेही. तथापि, त्यांचे नाव मोठे होऊ शकले नाही. अर्थात, “ऑल दि बेस्ट’ चित्रपटातील त्यांच्या कॉमेडीने त्यांना खूपच लोकप्रिय अभिनेता बनविले. त्यापूर्वी “धमाल’ चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती; परंतु हे सर्व चित्रपट येईपर्यंत संजय मिश्रा चाळीशीत पोहोचलेले होते. “आँखो देखी’ या चित्रपटाने संजय मिश्रा यांना मोठा अभिनेता बनविले. आता ते प्रत्येक चित्रपटाचा प्राण बनून गेले आहेत.
अभिनेत्री किरण खेर यांनी 1980 च्या दशकातच आपल्या करिअरची सुरुवात केली होती; परंतु मुलांच्या संगोपनासाठी चित्रपटांमधील करिअर सोडले होते, ही गोष्ट क्वचितच काही जणांना माहीत असेल. प्रदीर्घ कालखंडानंतर श्याम बेनेगल यांच्या सरदारी बेगम चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पुनरागमन केले. 1997 मध्ये किरण खेर यांना राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्यांना 2000 मध्ये बारीवाली चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र संजय लीला भन्साळी यांच्या “देवदास’ चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना प्रेक्षकांमध्ये खरी ओळख मिळाली. 2002 मध्ये आलेल्या या चित्रपटात त्यांनी सुमित्राची भूमिका केली होती. त्यावेळी त्याचे वय सुमारे 50 वर्षांचे होते.