Nawab Malik – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत कथित आर्थिक व्यवहार प्रकरणात जवळपास दीड वर्ष ईडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिक यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला. आरोग्याच्या समस्यांवर उपचार घेण्यासाठी नवाब मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आज अजित पवार गटाचे समर्थक नेते नवाब मलिक यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर इत्यादी नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेत विचारपूस केली.
अजित पवार यांनी, भाजप – शिवसेना (शिंदे) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय शरद पवार यांना मंजूर नसला तरी शरद पवार यांचे शिलेदार मानल्या जाणार्या अनेक बड्या नेत्यांनी तो मान्य केला आहे. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन गट पडले असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच तुरुंगात असलेले नवाब मलिक कोणत्या गटाला पाठिंबा देणार याबाबत चर्चा रंगली होती. नवाब मलिक आता तुरुंगातून जामिनावर सुटले असून त्यांची पुढील भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागले आहे.
अशातच अजित पवार गटाचे नेते आज नवाब मलिक यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने शरद पवार यांचा निष्ठावान मानला जाणारा आणखी एक नेता अजित पवारांच्या गटात जातो काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नवाब मलिक यांना अजित पवार गटाला पाठिंबा देण्याचं आवाहन या भेटीत करण्यात आल्याचं समजतंय.
नवाब मालिकांची भाजपला अडचण?
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत थेट पंगा घेतल्यानंतर नवाब मलिक यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा लागला होता. नवाब मलिक हे जवळपास दीड वर्षांपासून ईडीच्या ताब्यात होते. अशातच अजित पवार सत्तेत सामील होताच नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्याने केंद्रीय यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची आणखी एक संधी विरोधकांना मिळाली आहे. नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्यास ते भाजपला चालेल का? असा सवालही आता विरोधक उपस्थित करतायेत. यामुळे नवाब मलिक यांच्याबाबतीत पुढं काय घडत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अजित पवार शरद पवार भेटीवरून महाविकास आघाडीत नाराजी
शरद पवार व अजित पवार यांच्यात पुण्यात झालेली भेट महाविकास आघाडीत नाराजी ओढवणारी ठरली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत भाष्य करताना, अशा भेटी कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणाऱ्या ठरतात. तुम्ही नातलग म्हणून भेटीगाठी करत असताना रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्याने विचारधारेशी इमान राखून काम कसं करावं? अशी परखड टीका संजय राऊत यांनी केली.
राज्यात काँग्रेसही अलर्ट मोडवर
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींवरून काँग्रेसही अलर्ट मोडवर आहे. लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने तयारी सुरु केली असून नाना पाटोळे यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी व आगामी लोकसभा निवडणूक याबाबत चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट निवडणुका एकत्र लढविण्याच्या मानसिकतेत असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने मिळाले आहे.