नवी दिल्ली –शेतकरी संघटना 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार आहेत. त्या आंदोलनानुसार संबंधित दिवशी तीन तासांसाठी (दुपारी 12 ते 3) देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखले जाणार आहेत.
केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. आता आंदोलनस्थळांच्या परिसरातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आल्याचा आणि सरकारी यंत्रणांकडून त्रास दिला जात असल्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनांनी चक्का जामची घोषणा केली आहे.
त्याबाबतची माहिती शेतकरी नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. इंटरनेट सेवा ठप्प करण्याबरोबरच आंदोलनस्थळांचा वीज आणि पाणीपुरवठा विस्कळीत करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदींमध्ये कपात करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रियाही शेतकरी नेत्यांनी दिली. आता शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.