मुंबई – विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात 14 जणांची निवड करण्यात आली असून त्यात भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे. सुरुवात नेट गोलंदाज म्हणून असलेल्या अर्जुनसाठी पडद्यामागे सचिनने लावलेली सेटिंग यशस्वी ठरल्याचेच बोलले जात आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) संघाची घोषणा केली. अर्जुनने मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. 21 वर्षीय अर्जुनने याआधी भारतीय संघाच्या नेटमध्ये गोलंदाजी केली आहे. तसेच गेली दोन वर्षे अर्जुनला विविध स्तरांवरही संधी देण्यात येत होती. त्यावेळी प्रणव धनावडेसह अनेक अव्वल खेळाडूंऐवजी अर्जुनची निवड झाल्याने मुंबईच्या क्रिकेट वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याच्या निवडीमागे त्याची कामगिरी आहे की सचिनचा पाठिंबा असाही प्रश्न विचारला जात आहे.
पृथ्वी शॉ याचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली तरी पृथ्वीला फक्त ऍडलेड कसोटीत खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, हा सामना भारताने आठ गडी राखून गमावला होता.
अर्जुन आणि पृथ्वी यांच्यासह फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, सिद्धेश लाड, यशस्वी जयस्वाल, सर्फराझ खान, अरमान जाफर, धवल कुलकर्णी यांचाही समावेश करण्यात आला आहे.