मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झदरम्यानच्या ‘मेट्रो ३’ प्रकल्पासाठी आरे परिसरातच कारशेड उभारण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला असून, त्याला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या ‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा वापर करून बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत. या आदेशांवरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली.
नितेश राणेंनी या आदेशाचं पत्रक ट्वीट करत आदित्य यांना लक्ष्य केलंय. “राष्ट्रीय बाल हक्क आयोग अशाप्रकारे जी व्यक्ती स्वत: एक लहान मुल आहे तिला नोटीस कसं काय पाठवू शकतं, हा अन्याय मान्य नाही,” असे उपरोधिक ट्विट नितेश यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी इमोजी वापरुन शेवटी, “बच्चे की जान लोगे क्या” असा टोलाही लगावला आहे.
दरम्यान, आदित्य यांच्याविरोधातील या आदेशासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. शाळकरी मुलांचे पर्यावरणासंबंधीचे ज्ञान वाढविणे आणि त्यांना पर्यावरणासंबंधी जागृत करणे हे पालक, शिक्षक आणि सर्वांचे कर्तव्य आहे. जंगल वाचविण्यासाठी जर मुले पुढे आली, पर्यावरणाबाबत जागृत होण्याचा प्रयत्न करू लागली तर तो गुन्हा आहे का? असा सवाल ‘वनशक्ती’चे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यानी केला आहे. आरेमध्ये लहान मुले आपल्या पालकांसोबत आंदोलनासाठी आली होती. आपल्या मुलांना जंगलाचे महत्त्व कळावे म्हणून पालक मुलांना घेऊन आले होते. आदित्य ठाकरे यांनी मुलांना आणले नव्हते, असे स्पष्ट करीत त्यांनी आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. हे केवळ राजकारणातून घडत असून ‘आरे वाचवा’ आंदोलनावरून राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.