पवित्र ते कुळ पावन तो देश l
जेथे हरीचे दास जन्म घेती ll
सह्याद्रीच्या पर्वतरांगांत पैकी सातपुडा या पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या (मु.पो. टेंभे, ता. शिरपूर, जि.धुळे) या पश्चिम खानदेशात तापीच्या काठावर वडील श्री डोंगरसिंग व मातोश्री रतनकुंवर रजपूत या धर्मपरायण माता पित्यांच्या उदरी भाद्रपद शुद्ध १४(अनंत चतुर्दशी) दि. १०सप्टेंबर १९१६ रोजी नथसिंग महाराजांचा जन्म झाला. नथसिंग महाराजांचे आजोबा ” तिरतसिंग” राजपूत हे पंढरीची वारी करत असत तीच परंपरा पुत्र डोंगरसिंग यांनी ही चालवली.
राजपूत घराणे हे त्यांच्या शूर-वीर ते साठी प्रसिद्ध च आहे. नथुसिंग महाराजांना ४ बहिणी व २ भाऊ असा त्याचा परिवार होता. वयाच्या ६ व्या वर्षी ते शाळेत जाऊ लागले. पुढील शिक्षणासाठी आजोळी (मु. पो.तामथरे,ता.शिंदखेडा, जि.धुळे) तेथे पाठवण्यात आले. या तामथरे गावी पूज्य वै. मारुती महाराज गुरव व बंकट स्वामी महाराज हे किर्तनासाठी येत असत बाल नथसिंग हे मूळातच धार्मिक वृत्तीचे होई आजी-आजोबा सोबत ते गावात किर्तन श्रावणासाठी जात असत या श्रावणाचा महाराजांच्या जीवनावर प्रभाव होऊन त्यांची आध्यत्मिकतेत अधिक रुची वाढत गेली. शिक्षण सुरूच होते वयही वाढत होते. घरची मंडळी त्यांना उदयोगाला लावण्यासाठी शिवणकाम, बाजारात धान्य विकणे, इ.कामात पारंगत करण्यात व्यस्त होती परंतु महाराजांना या कामात यश येईना.
नामस्मरण, मनन, चिंतनात त्यांना विशेष रुची होती ती अधिक वृद्धिंगत होत होती.
अंतरंग भक्तीमय होऊन महाराजांच्या वैराग्याला उधाण आले आता आपण घरी न राहता आळंदीस जावे असे त्यांना वाटू लागले एके दिवशी घराच्या भिंतीवर मी घरातून १६ रुपये काढून आळंदीला जातो आहे असा मजकुर लिहून ते आळंदीला रवाना झाले. आळंदीस काही दिवस वास्तव्य करून ते देहूला आले महाराजांची अवस्था उदास साधकीय वृत्तीची होती साधना हाच त्यांच्या वृत्तीचा स्थायीभाव होता ” भंडारा,भामचंद्र, घोरडा” डोंगर ही श्री संत तुकाराम महाराजांची साधना स्थाने नथसिंग महाराजांची तपस्थलीच होती याच भूमीवर पूज्य महाराजांनी नामसाधना, ध्यानसाधना,आणि त्यांच बरोबर गाथा, ज्ञानेश्वरीचा यथासांग अभ्यास केला, वै.गु. मारोती महाराज गुरव व बंकट स्वामी महाराज, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर या महात्म्याच्या सानिध्यात अध्यामिक उंची अधिकाधिक वाढत होती. पूज्य मारोती महाराज गुरावांच्या कडून श्रवण केली ज्ञानेश्वरी इतर गुरुवर्य मंडळी कडून केलेले शास्त्र श्रवण जीवनात उतरवण्यासाठी पर्यंत ते या डोंगरावर करत असत.
काळसारावाचिंतेने l या तुकोक्ती प्रमाणे महाराज चिंतनात निमग्न असत पूज्य कदम माऊली,शांताराम गुरुजी याचा सहवासाने चिंतनास अधिकच बळ मिळत असे नथुसिंग महाराजांचे शुद्ध सात्विक व तत्वनिष्ठ जीवन पाहून पूज्य विठ्ठल महाराज चौधरी( मोठेबाबांच्या) सुचनेवरून त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. महाराज विध्यार्थीना विचारासागर हा ग्रंथ शिकवत असतं हा ग्रंथ त्यांचा तोंडपाठ होता रसाळ मधुर वाणीतून विद्यार्थी हा पाठ ऐकण्यात तल्लीन होत असत. डोळे बंद करून हसत मुखाने ते अवघड वाटणारा हा ग्रंथ अगदी लीलया शिकवत असतं शिस्तीचे पालन विद्यार्थ्यांनी करावे यासाठी ते आग्रही असे तितकेच ते दयाळू ही होते जीवनभर नथसिंग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची सेवा केली. किर्तन- प्रवचन हा महाराजांचा मुख्य विषय ते उत्तम लेखक ही होते त्यांनी साधना उपयुक्त ग्रंथसंपदा निर्माण केली.
१)जगदुरू तुकाराम महाराजांची सार्थ २ खंडात प्रसिद्ध व लोकप्रिय आहे .
२)नैमित्तिक किर्तनमाला
३) हरिपाठ विवरण – श्री संत ज्ञानेश्वर/ एकनाथ .
४)संत मीराबाई चरित्र
५)वै. गु.मारोती महाराज गुरव यांचे चरित्र.
संस्थेचे विद्यार्थी त्यांना आदराने बाबा म्हणत असत. संत वाङ्मयाच्या प्रचारासाठी कीर्तनकार ,गायक, वादक आणि साधकांचा समूह घेऊन पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण खानदेश व वऱ्हाडाचा काही भाग असा २ महिन्याचा दौरा काढून ते खेडोपाडी संप्रदायाचि परंपरा वाढवत होते. विनोबाजी भावे यांच्या पवनार येथील आश्रामत ही बाबा कीर्तने करीत असत
जीवनाच्या अंतिम क्षणा पर्यंत त्यांनी संस्थेची व वारकरी संप्रदायाची सेवा व प्रचार करून हजारो साधक निर्माण केले. हा अखंड तेवत असणारा प्रचाराचा नंदादीप आश्विन शुद्ध१३.दिनांक १८/१०/२००२ रोजी आपले जीवन ज्योत श्री माऊलींच्या चरणी विलीन करून कीर्तिरूपाने अमर झाले. वंदनीय बाबांच्या स्मृतींचे स्मरण करून त्याप्रमाणे आपल्या ही जीवनाची वाटचाल घडावी. बाबांच्या चरणी कोटीं कोटी वंदन.
(शब्दांकन- उमेश बागडे, संदर्भ- शतामृतधारा)