कोलकाता – बांगलादेशात दुर्गापूजेच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या प्रकारातील कोणाही दोषींना मोकळे सोडले जाणार नाही. त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. या प्रकारांमागे बीएनपी आणि जमाते हे घटक असावेत अशी आशंका असून त्या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे.
बांगलादेशाची प्रतिमा मलिन करून देशातील सलोखा बिघडू देण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे बांगलादेशचे गृहमंत्री असदुझमान खान कमाल यांनी म्हटले आहे.
पीटीआयला फोनवर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बाब नमूद केली आहे. ते म्हणाले की, बांगलादेशात 2023 साली निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रकार केले गेले असावेत असा कयास आहे. आम्ही दोषींना हुडकून काढण्यासाठी तपास सुरू केला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हे दोन्ही घटक या देशाचेच घटक आहेत. त्यांच्या हिताला बाधा येईल असे वातावरण आम्ही निर्माण होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ढाका शहरापासून शंभर किमी अंतरावर असलेल्या कमिला भागात दुर्गा पूजा मंडपावर हल्ला करण्यात आला. तेथे झालेल्या हिंसक प्रकारात पाच जण ठार झाले आहेत.
त्यात पोलिसांनी गेलेल्या गोळीबारात ठार झालेल्या चार दंगेखोरांचा समावेश आहे अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आतापर्यंत शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही या साऱ्या प्रकरणात अत्यंत परिणामकारक उपाययोजना करीत असून बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या संबंधात भारताने चिंता करू नये, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.