नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. एनडीए सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर आज तिसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चा सुरू होती.विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांवर मोदी उत्तर देत होते यावेळी त्यांनी काँग्रेसच्या सुरुवातीपासूनच्या काळाचे वर्णन देखील केले.
हे इंडिया गटबंधन नसून घमंडीया गटबंधन आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. विरोधकांनी इंडियाचे (I N D I A ) तुकडे केले असं देखील पंतप्रधान यावेळी म्हणाले.
पंतप्रधान यावेळी काँग्रेसवर बोलत राहिले. पंतप्रधानांनी थेटपणे विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे न दिल्याने विरोधकांनी सभागृहात मणिपूरच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली.
मात्र, मोदी यावेळी म्हणाले, आम्ही जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. पण जगात भारताच्या प्रतिमेला डाग लागेल यासाठी अजूनही काही जण प्रयत्न करत आहेत. पण जगालाही भारताचं महत्त्वं कळलं आहे आणि भारतावरील जगाचा विश्वास वाढत आहे
देशापेक्षाही विरोधकांसाठी पक्ष मोठा आहे, हे अनेक विरोधी पक्षांच्या वर्तनावरून दिसून आलं. यामुळे गरीबांच्या भूकेची नाही तर सत्तेची भूक विरोधकांच्या डोक्यात भरलेली आहे. विरोधकांना फक्त आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे.
परमेश्वराने विरोधकांना बुद्धी दिली आणि त्यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. हा सरकार विरोधातला अविश्वास नाही, तर त्यांच्याच विरोधातला आहे. अशी खोचक टीका देखील पंतप्रधान मोदींनी केली.