पुणे –केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही सुडबुद्धी आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. “नियम ध्यानात घेता राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना अटक करता येणार नाही. तरीही कोकणात जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने अटक करण्याचे वातावरण निर्माण केले जात आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
पाटील हे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “नारायण राणे यांनी काही बोलल्यानंतर त्याला विरोधक उत्तर देऊ शकतात. परंतु, एखाद्या वाक्याच्या आधारे केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला थेट अटक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे राज्य सरकारच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दलच शंका निर्माण करणारे आहे. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने न्यायालयाकडून थपडा खाल्या आहेत, तशा या प्रकरणातही बसतील. राणे यांची बोलण्याची एक शैली आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.’