नवी दिल्ली – करोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारला मदत करण्याऐवजी भलतेसलते आरोप व दावे करून कॉंग्रेस देशाला बदनाम करत आहे, असा आरोप भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.
काल अमेरिकेचे माजी दूत निकोलस बर्नस यांच्याशी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यात अमेरिका आणि भारत यांच्यातील सहिष्णुतेचा डीएनए आता संपुष्टात आल्याचे विधान राहुल गांधी यांनी केले होते. त्याला आक्षेप घेताना नक्वी यांनी म्हटले आहे कीे, भारतात सहिष्णुता पूर्ण शाबूत असून देशात सर्वच पातळ्यांवरील सलोखा कायम आहे.
भारतात प्रत्येक जण आनंदात राहात असून भारत आपल्या महान सांस्कृतिक मूल्यांशीच बांधील आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पण चुकीची माहिती असलेल्या नेत्यांना या स्थितीची माहिती नाही. भारताला कोणाच्या डीएनए सर्टिफिकेटची गरज नाही, असा टोमणाही त्यांनी राहुल गांधी यांना मारला. सहिष्णुता आणि धार्मिक सलोख्याच्या आधारावरच हा महान देश विविधतेतून एकता साधत आहे, असा दावाही त्यांनी केला.
करोना संक्रमणाच्या काळातही कॉंग्रेसचे नेते या समस्येचे निराकरण करण्यास मदत करण्याऐवजी राजकीय प्रदूषण करून समस्या निर्माण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या पक्षाची राजकीय दिवाळखोरी निघाल्याने ते आता देशाला बदनाम करीत आहेत, असे नक्वी म्हणाले