पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहरातील गुन्हेगारांची “नागपूर पॅटर्न’ स्टाइलने झडती घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणात राहण्याची अपेक्षा पोलीस आयुक्तालयात बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना होती. त्यांच्या देहबोलीतून तसा आत्मविश्वासही दिसत होता. मात्र, मागील काही दिवसांत घडलेल्या घटना पाहता गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक आहे, की नाही? असा सवाल उपस्थित राहतो आहे.
आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल झालेल्यांची झडती पोलीस आयुक्तालयात घेण्यात आली. त्याच रात्री शिवाजीनगर हद्दीत बांधकाम व्यावसायिकावर “मुळशी पॅटर्न स्टाइल’ हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर शहरात सुरू झालेले गोळीबाराचे सत्र सुरूच असून, सलग चौथ्या दिवशी तशीच घटना घडली.
पुणे पोलीस आयुक्तलय आवारात शहरातील सर्व छोट्या-मोठ्या टोळ्यांची हजेरी घेण्यात आली होती. यानंतर अंमली पदार्थ विक्रीचे गुन्हे दाखल असणाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. तर, नुकतीच आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल असलेल्यांची झडती घेतली गेली. तरीही गुन्ह्यांचा आलेख चढताच आहे. गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा वापर केला जात आहे.
घटनाक्रम
१. मंगळवार, दि. १६ एप्रिल : शिवाजीनगर परिसरात दुपारी पावणेदोन वाजता बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न
२. बुधवार, दि. १७ एप्रिल : हडपसर येथे व्यावसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळ्या झाडल्या.
३. गुरुवार, दि. १८ एप्रिल : पहाटेच्या सुमारास भुमकर चौक-नऱ्हे येथे माचीस मागितल्याच्या कारणातून दोघांवर गोळीबार झाला.
४. शुक्रवार, दि. १९ एप्रिल : पहाटेच्या सुमारास येरवडा येथील अग्रसेन शाळेसमोर सराईतांनी एकावर गोळीबार केला. या घटनेत विकी राजू चंडालिया ( रा. जय जवान नगर, येरवडा ) जखमी झाला आहे. या प्रकरणी आकाश चंडालिया, अक्षय चंडालिया, अमन चंडालिया, अभिषेक चंडालिया ( सर्वजण रा. रेंजहिल्स,पुणे ), सुशांत कांबळे ,
संदेश जाधव, संकेत तारू (सर्व रा. येरवडा ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैयक्तिक वादातून हा प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर, उपायुक्त(गुन्हे) अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
पब चालकांचा रात्रभर “धिंगाणा’
दिलेली वेळ पाळण्याचे आदेश पब चालकांना सांगण्यात आले होते. तसेच पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनाही लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले. मात्र, खुद्द महापालिकेकडून तीन-तीन तक्रार अर्ज देऊनही पबवर कारवाई झालेली नाही. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका संयुक्त बैठकीत हा विषय काढल्यावर आयुक्तालयातूनच कारवाईसाठी पथक पाठवले गेले.
संबंधित पब सील झाले. तसेच महापालिकेनेही अतिक्रमण कारवाई केली. यानंतर तरी शहरातील पब नियम आणि वेळ पाळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, स्थानिक पोलिसांना हाताशी धरुन आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांना पबवाले जुमानेनात अशी घटना पुन्हा घडली. कल्याणीनगर येथे एका पबमध्ये वेळेचे बंधन धुडकावून मद्यविक्री सुरू असल्याने त्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. मात्र, याची कल्पना आयुक्तालयातील वरिष्ठांना नव्हती.