नागपूर – शहरातील हजारीपहाड परिसरात गुरूवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेत दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. देवांश रणजित उईके (७) आणि प्रभास रणजित उईके (२) अशी मृत मुलांची नावे आहेत. गोरखेडे कॉम्प्लेक्सजवळ एका कच्च्या घराला लागलेल्या आगीत मुले होरपळून गेली.
रात्री थंडी असल्यामुळे घरात शेकोटी पेटवली. आग घरभर पसरली. घर वस्तीपासून बाजूला असल्याने लोकांना आरडाओरडा ऐकू गेला नाही. घरात दोन सिलेंडर होते. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही. नाही तर मोठा स्फोट झाला असता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले.
मात्र, आग कशी लागली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. गोविंद घोरपडे कॉम्प्लेक्सजवळील आऊटहाऊस सारख्या घरात आई, एक मुलगी आणि दोन मुले राहत होती. सध्या नागपुरात थंडी परतली आहे. त्यामुळे हात शेकण्यासाठी घरात आग पेटवण्यात आली होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घरात आग पेटवण्यात आली त्यावेळी घरात तीन मुले आणि त्यांची आई होती. मात्र, त्यांची आई काही कामानिमित्ताने बाहेर गेली असता अचानक घरात आग लागली पसरली. कच्च्या विटांच्या घरावर तात्पुरते छप्पर टाकून हे कुटुंब राहात होते.
आग लागल्यानंतर घरात असलेली मुलगी बाहेर आली, मात्र दोन्ही मुले घरात अडकली, त्यामुळे दोन्ही मुलांना आपला जीव गमवावा लागला. मुलगी बाहेर येताच तिने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना गोळा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला.
अग्निशमनदलाला घटनेची माहिती मिळताच चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तत्काळ आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरात असलेल्या दोन्ही मुलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मुलांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.