शेवगाव,(प्रतिनिधी) – आपल्या आहारात तृणधान्याचा जास्तीत न वापर करावा. पॉलिश तांदळाऐवजी रेशन किवा विनापॉलिश तांदळाचा आहारात वापर करावा. सेंद्रिय खतावर पिकवलेला भाजीपाला आहारात वापरावा जेणेकरून कॅन्सर सारख्या दुर्धर आजारापासून दूर राहता येईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अकुंश टकले यांनी केले.
नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, वाघोलीमध्ये आज कृषी व्यवसाय विषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी टकले, होडशीळ यांनी मार्गदर्शन केले.
सध्याच्या आधुनिक काळातील शेतीमध्ये सेंद्रिय / जैविक खतांचा वापर याविषयी त्यांनी माहिती देऊन रासायनिक खतांचा व औषधांचा आरोग्यावर कसा दुष्परिणाम होतो, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शाळेत कार्यान्वित गांडूळ खत प्रकल्प व बायोगॅस प्रकल्प पाहून त्यांनी सरपंच सुष्मिता भालसिंग, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य , शिक्षक यांचे अभिनंदन केले.
गावचे युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग यांनी प्रास्ताविक करताना शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहेर यांचेही भाषण झाले. मुख्याध्यापिका मोरे यांनी आभार मानले.