क्षमता 16 जणांची मात्र 101 कैद्यांना ठेवले कोंबून
शंकर दुपारगुडे
कोपरगाव- कोपरगाव दुय्यम कारागृहातील कच्च्या कैद्यांना अजब सजा भोगण्याची वेळ आली. कोंबड्या जशा एखाद्या खुराड्यात कोंबून ठेवल्या जातात, त्याप्रमाणे कारागृहात कैद्यांना अक्षरशः ठेवण्यात आले आहे. 10 बाय 12 फुटांच्या एका बराकीत 4 कैद्यांची क्षमता असताना आज त्या बराकीत तब्बल 27 कैद्यांना ठेवण्यात आल्याने कैद्यांना झोपणे तर दूर व्यवस्थित बसता येत नाही. आळीपाळीने काही तासांसाठी झोपावे लागते. दाटीवाटीने रहात असल्याने कैद्यांच्या अनेक समस्या वाढल्या.
राज्यात करोनाची तिसरी लाट डोकेवर काढण्याची शक्यता असताना कोपरगाव दुय्यम कारागृहात तर करोनाच्या शासकीय नियमाची एैशीतैशी करण्यात आली. केवळ चार बराकीत तब्बल 101 आरोपी शेळ्या मेंढ्यासारखे कोंबले आहेत. तुरुंग प्रशासनाची यातून डोकेदुखी वाढली आहे. बराकीतील आरोपींच्या सर्वसामान्य हक्कांची देखील त्यातून पायमल्ली होऊन त्यांना सुविधा मिळत नसल्याची बाब पुढे आले आहे.
कोपरगाव तहसील कार्यलयाजवळ हे दुय्यम कारागृह असून कारागृहाच्या आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक आरोपींची संख्या सध्या येथे झाली आहे. पाच बराकी असून 16 आरोपींना ठेवण्याची त्यांची क्षमता आहे तर महिला कैद्यांसाठी एक राखीव बराक आहे. सध्या एकच महिला कैदी आहे. तिच्या एकटीमुळे बराक अडकुन राहिल्यास इतर कैद्यांची गैरसोय होवू नये म्हणून त्या महिला आरोपीला राहुरी कारागृहात स्थलांतर केले. सध्या कारागृहात चार तृतीयपंथी आरोपी असल्याने त्यांना एक स्वतंत्र बराक देण्यात आली तर उर्वरित चार बराकीमध्ये प्रत्येकी 26 ते 27 कैद्यांना अक्षरशः कोंबण्यात आले.
कोपरगाव, राहाता, शिर्डी, लोणी परिसरातील खून, मारामारी, चोरी, रस्तेलुट, कौटुंबिक वाद यासह विविध प्रकरणातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून सर्वाधिक आरोपी राहाता तालुक्यातील आहेत. दहा बाय बाराच्या जागेत एक बराक असून त्यातच आरोपींसाठी शौचालय, स्नानगृह आहे. झोपण्यासाठी जागा कमी पडत असल्याने त्यांच्यात अनेकदा भांडणे, मारामाऱ्या होत असतात. शरीराला झोप अत्यंत महत्वाची असल्याने येथील कैदी सध्या झोपेसाठी धडपडत आहेत.
घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवून झोपावे लागते. ठराविक वेळेत काही कैदी झोपतात तर काही कैदी बसतात आणि उर्वरित झोपलेल्यांना उठविण्यासाठी घड्याळांच्या काट्याकडे टक लावून बघत बसतात. जर एखादा ठरलेल्या वेळेत उठला नाही तर गोंधळ सुरु होतो. झोपण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने येथील कैदी रात्रभर झोपण्यापेक्षा झोप लागु नये म्हणून प्रयत्न करीत असतात.
मोठमोठ्याने गाणे म्हणत आरडाओरड करीत झोपेची वेळ पुढे ढकलत रात्र जागुन काढतात. काहींनी दिवसा झोपुन रात्रभर जागतात तर काहींनी खडा पहारा देत जागते रहो म्हणतात. ज्यांना झोपण्याची संधी मिळते. त्यांना झोप लागत नाही कारण जागणाऱ्या कैद्यांच्या आरडाओरडीने झोप येत नाही. आम्हाला झोपु द्या, ओरडता का म्हणून पुन्हा त्यांच्यात वाद होतो.
याबाबत तुरुंग निरीक्षक अरुण रणनवरे म्हणाले, बराकीतील आरोपींची संख्या कमी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे. न्यायालयात अर्ज दाखल केला असून 60 आरोपींना नाशिक, औरंगाबाद व पुणे येरवडा कारागृहात रवानगी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाने केवळ तीन आरोपींना स्थलांतरित करण्याचे आदेश दिले.
आणखी आरोपींना मध्यवर्ती कारागृहात हलवावे यासाठी न्यायालयामार्फत प्रयत्न सुरू आहेत. करोना काळात गेल्या दीड वर्षांपासून नियमांची पायमल्ली होऊ नये, म्हणून आरोपीं स्थलांतरित केले नाहीत. त्यामुळे कोपरगाव दुय्यम कारागृहात कैद्यांची संख्या वाढली. 104 कैद्यांचा विक्रम या कारागृहात झाला आहे. तीन कैदी कमी झाल्याने आता 101 कैदी येथे बंदिस्त आहेत.
दरम्यान, चांगली वर्तणूक असलेले सामान्य गुन्ह्यात तात्पुरती अटक झालेले आरोपींना सुध्दा जागेअभावी अट्टल गुन्हेगाराबरोबर बराकीत ठेवल्याने ढवळ्या शेजारी पवळ्या बसल्यानंतर वाण नाही तरी गुण घेतो’अशी अवस्था कोपरगाव येथील काहींची झाली आहे. एखादा गुन्हा सिध्द झाल्यानंतर जी सजा व्हायला पाहीजे. त्यापेक्षा भयानक सजा आरोप, गुन्हा सिध्द होण्यापूर्वी भोगण्याची वेळ आली आहे, अशीच भावना येथील आरोपींची आहे.
* प्रशासनाची तारेवरची कसरत
कैद्यांमध्ये अनेकवेळा मारामारी झाल्या. एकमेकांना खेटुन बसल्याने व झोपल्यामुळे त्वचारोगाची लागण होत आहे. यापूर्वी एका कैद्यावर अट्टल गुन्हेगारांनी अनैसर्गिक अतिप्रसंग केला होता. कैद्यांची वाढती संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. गर्दीमुळे कैद्यांच्या आरोग्याची समस्या वाढली आहे. सतत आजारी पडण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे कैद्यांना उपचारासाठी जेलच्या बाहेर काढणे पोलीसांपुढे मोठे संकट असते. पोलिसांचे संख्या बळ अपुरे असल्याने सुरक्षेच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. झोपण्याच्या जागेअभावी गेल्या आठवड्यात आरोपींमध्ये मारामाऱ्या झाल्या. त्याचा गुन्हा प्रशासनाने दाखल केला. आरोपींची संख्या जास्त झाल्याने तुरुंग प्रशासन व पोलीस प्रशासनावर त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे. आरोपींना आरोग्य सुविधा देताना प्रशासनाची तारेवरची कसरत सुरू आहे.