जिल्हाधिकाऱ्यांची यांची घेतली भेट
पारनेर – नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असतानाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश झालेला नाही. या प्रश्नावर प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठवू असा इशारा आमदार नीलेश लंके यांनी दिला. पाऊस कमी असलेल्या जिल्ह्यातील त्या तालुक्याचा समावेश करावा, या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असे आ. लंके त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर आ. लंके यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याचा आढावा घ्यावा. पारनेर-नगरसह पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राहुरी या तालुक्यातील टंचाईची स्थिती भीषण असल्याचे आ. लंके यांनी निदर्शनास आणून दिले. कृषी व महसूल विभागाची बैठक घेऊन शासनास अहवाल पाठवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली.
जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आ. लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्याच्या इतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात येत असताना नगर जिल्ह्यावर अन्याय होत असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या दुष्काळी स्थितीची वस्तुस्थिती त्यांच्यापुढे मांडणार आहे.
तरीही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास सर्व माहितीचे संकलन करून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दुष्काळी उपाययोजना पदरात पाडून घेऊ. जिल्ह्यातील बहुतांश तलाव, बंधारे, कोल्हापुर पद्धतीचे बंधारे यांच्यात पाणीसाठा नाही. लवकरच पाण्याची टंचाई निर्माण होणार असून त्यासाठी टॅंकर भरायचे कुठे असाही प्रश्न निर्माण होणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.
जिल्हाधिकारीही आवाक
आ.नीलेश लंके जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटले तेव्हा त्यांच्याकडे टंचाईसंदर्भात इत्यंभूत माहिती होती. ही माहिती पाहून जिल्हाधिकारी सालीमठ देखील आवाक झाले. ही माहिती कुठून संकलित केली, अशी विचारणाही जिल्हाधिकाऱ्यांनी आ. लंके यांच्याकडे केली.