संगमनेर, (प्रतिनिधी) – सोमवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्याप्रमाणेच वीटभट्टीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने वीटभट्टीमध्ये विटा बनवण्यासाठी लागणारी माती वाहून गेली.
त्याचप्रमाणे भट्टीत टाकलेल्या विटांचे देखील नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त वीटभट्टींचे पंचनामे करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी वीट व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात वाऱ्यांसह जोरदार पाऊस कोसळला. पावसाने विटांची पूर्णतः माती झाली आहे. वीटभट्टीमध्ये काम करण्यासाठी इतर ठिकाणाहून कामगार आणले जातात. परंतु अवकाळी पावसाने नुकसान झाले तरी या कामगारांना पगार आणि रोजची हजेरी द्यावीच लागत आहे.
दरवर्षी अवकाळीमुळे वीटभट्टी व्यवसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागते परंतु शासनाकडून कोणतीही मदत होत नाही. त्यामुळे वीटभट्टीचे पंचनामे करून सरकारने आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कैलास वाकचौरे, राजेंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, मच्छिन्द्र जोर्वेकर, रमेश भालेराव यांनी केली आहे.