नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कालच्या ठरावात कोविड स्थितीबद्दल पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका करणारा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवून कॉंग्रेस देशात नाहक घबराट पसरवत असल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी सोनियांना हे चार पानी पत्र पाठवले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, करोनासारखी आपत्ती देशात शंभर वर्षांतून एखाद्यावेळी येते. अशा स्थितीत कॉंग्रेसचे मुख्यमंत्री व अन्य नेते लसींच्या संबंधातही गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी सरकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोविडचा लढा देत आहेत. सर्वांचे ते यात सहकार्य घेत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे. अशा आव्हानात्मक स्थितीत कॉंग्रेसने जी भूमिका घेतली आहे, त्याबद्दल आपल्याला दुःख होते आहे, पण त्याचे आपल्याला आश्चर्य मात्र वाटत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
देशातील कोविड स्थितीच्या हाताळणीत मोठ्या चुका केल्या असून, त्याबद्दल मोदी सरकारने प्रायश्चित्त घेतले पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेसने कालच्या ठरावात केली होती.
कोविडचा संबंध सतत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाशी कॉंग्रेसकडून जोडला जात आहे, त्याबद्दलही नड्डा यांनी संताप व्यक्त केला आहे. देशात लॉकडाऊनची मागणी करणे आणि नंतर त्याला विरोध करणे असाही प्रकार कॉंग्रेसकडून सुरू असल्याची टीका नढ्ढा यांनी केली आहे.
कॉंग्रेसच्या नेत्यांनीही निवडणूक काळात केरळात मोठ्या सभा घेतल्या होत्या, असेही त्यांनी यात म्हटले आहे. कोविडच्या दुसऱ्या साथीत कॉंग्रेसचे नेतेच सुपरस्प्रेडर ठरले असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे.