प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पानशेत धरण यावर्षी पहिल्यांदाच 100 टक्के भरले आहे. त्यामुळे पानशेत धरणातून खडकवासला धरणात सुरुवातीस 683 क्युसेकने, तर नंतर 12 हजार 936 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे खडकवासला धरणातूनही विसर्ग वाढविण्यात आला असून, यावर्षी पहिल्यांदाच 27 हजार क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी दुधडी भरून वाहू लागली आहे.
बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला असून, नदीकाठचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे या परिसरातील ओढे-नाले वाहू लागले आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊ लागले. पानशेत धरण कालच 96 टक्के भरले होते. गुरुवारी रात्री ते 100 टक्के भरल्याने धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता 683 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
सकाळी सहा वाजता 977 क्युसेक, त्यानंतर टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ करण्यात आली. 12 हजार 936 क्युसेक, त्यानंतर 18 हजार 784 क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात येत होते. सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग कमी करून 12 हजार 936 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
दरम्यान, पानशेत धरणातून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होत असल्याने खडकवासला धरण पुन्हा 100 टक्के भरले. त्यानंतर खडकवासला धरणातूनही आज पुन्हा पाणी सोडण्यास सुरुवात झाली. दुपारी 12 वाजता 3 हजार 424 क्युसेक, दोन वाजता 9 हजार 416 क्युसेक आणि चार वाजता 18 हजार 491 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता विसर्ग वाढवून 26 हजार 809 क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले.
गुरुवारी दिवसभरात खडकवासला धरणात 2 मिमी, पानशेतमध्ये 48 मिमी, वरसगावमध्ये 48 मिमी आणि टेमघरमध्ये 60 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 95 टक्के म्हणजे 27.56 टीएमसी उपलब्ध आहे.