पिंपरी -उन्हाळ्यात होणाऱ्या हिट स्ट्रोकवरील उपचारासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची रुग्णालय सज्ज झाली आहेत. अशा आजारांवरील रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर त्वरित उपचार केले जाणार आहेत. यावर योग्य खबरदारी घेण्याबाबत केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडूनही महापालिकेला गाइडलाइन्स प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कडक उन्हात गेल्यास नागरिकांना हिट स्ट्रोकचा त्रास जाणवतो. यामध्ये बेशुद्ध होण्यापासून मृत्यू देखील ओढावण्याची देखील दाट शक्यता असते. अनेकांना उष्माघाताचा देखील त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्या बाबत योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन वारंवार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून केले जात आहे. हिट स्ट्रोकवर योग्य उपचार होण्यासाठी महापालिका रुग्णालयात सुविधा देण्याची सूचना केंद्र शासनाकडून महापालिकेला प्राप्त झाली आहे.
केंद्र शासनाच्या गाइडलाइन्सनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रमुख रुग्णालयांसह इतर रुग्णालयातही हिट स्ट्रोकवर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांना वैद्यकीय विभागाकडून उपचार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच औषधे, आवश्यक सामग्रीची देखील सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी असा त्रास जाणवल्यास त्वरीत महापालिका रुग्णालयात उपचार घेण्याला प्राधान्य देण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
हिट स्ट्रोकची लक्षणे
डोकेदुखी, तीव्र ताप, बेशुद्ध होणे, त्वचा लाल पडणे, उलटी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, मानसिक स्थिती बिघडणे
हिट स्ट्रोकबाबत केंद्र शासनाच्या गाइडलाइन्स आलेल्या आहेत. वैद्यकीय विभागाकडून आम्हाला त्या प्राप्त झाल्या आहेत. रुग्णालयात हिट स्ट्रोकच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी योग्य खबरदारी घेतली आहे.
– डॉ. सुनिता साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, जिजामाता रुग्णालय.
काळजी घेण्याची गरज
गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून सकाळी 11 नंतरच तीव्र उष्णता जाणवू लागली आहे. याचा थेट आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. तापमान वाढत असल्याने शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खूपच गरज असल्याने बाहेर पडावे लागले तर पाण्याची बाटली, टोपी, स्कार्फ सोबत ठेवावे. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे, असे डॉक्टर सांगतात.
हे खा
ताजे, पचायला हलके असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
लिंबू पाणी, ताक, शहाळे अशी पेय घ्यावी.
भाकरी, वरण-भात, हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा.
हे टाळा
तेलकट, तिखट व बाहेरील खाद्य पदार्थ
अत्याधिक मांसाहार
लोणचे, चटण्या.
ही दक्षता घ्या
सनग्लास, टोपी, स्कार्फचा वापर करावा.
पाण्याची बाटली किंवा थंड पेय सोबत ठेवावे.
सकळच्या वेळी किंवा सायंकाळी उनकमी झाल्यावर बाहेर पडावे.